Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो-लाखो आंदोलकांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. कारण मराठा आंदोलनाच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटेच राज्य सरकारकडून त्याचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. तो अध्यादेश मनोज जरांगे याना सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली. यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयावर हरकती मागवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या असल्याची माहिती दिली. यावेळी “झुंडशाहीने कायदा आणि नियम बदलता येत नाही”असे म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.
मनोज जरांगे यांनी ज्या ‘सगेसोयरे’ या शब्दासाठी हट्ट केला होता, त्या ‘सगेसोयरे’ या शब्दावरदेखील भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. सरकारने जरी अध्यादेशात सगेसोयरे या शब्दाचा उल्लेख केला असला तरी ‘सगेसोयरे’ कायदाच्या कसोटीवर टिकणार नाही” असा दावा यावेळी त्यांनी केला. त्यासोबतच मराठा समाज ओबीसीत आल्याने EWS च आरक्षण त्यांनी गमावले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
पुढे कुणबी समाजाच्या प्रमाणपत्रावर बोलताना भुजबळ यांनी, “जात जन्माने येते कोणत्या प्रमाणपत्राने येत नाही” अशी टीका केली. त्यासोबतच सरकारच्या निर्णयावर बोलताना ओबीसींवर अन्याय केला जात आहे. तसेच मराठ्यांना फसवलं जात आहे. याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. असे म्हणत भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यासोबतच मराठा समाजाला निर्दशनास आणून द्यायचे आहे सरकारच्या अध्यादेशानुसार आरक्षणत १७ टक्क्यात ८०-८५ टक्के ओबीसी येतील, त्यामुळे ही समाजाची फसवणूक असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्या पाच वाजता भुजबळांच्या सरकारी निवासस्थानावर या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.