Rohit Pawar : लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखं, रमेश कराडांच्या विधानावर रोहित पवारांचा संताप

Ramesh Karad On Rohit Pawar : लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार रमेशअप्पा कराड यांनी आपल्या मतदारसंघाबाबत केलेलं एक वक्तव्य सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादाचा विषय ठरलं आहे. त्यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाची तुलना “पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखा” असा उल्लेख करत केली. या विधानाने लातूर ग्रामीणमधील जनतेच्या भावना दुखावल्या असून कराड यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवारांचा ट्विटरवरून हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी ट्विटरवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “बेताल बरळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांचाही समावेश झाला.
‘लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखा प्रकार’, हे त्यांचं वक्तव्य म्हणजे लातूर ग्रामीण मतदारसंघातील तमाम जनतेचा अवमान आहे आणि याबाबत त्यांनी माफी मागितली पाहिजे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय हे व्यासपीठावर असूनही त्यांनी कराड यांना रोखलं नाही, त्यामुळं त्यांचाही या वक्तव्याला पाठींबा आहे का? असा प्रश्न पडतो, असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांचा त्यांचा वक्तव्याला पाठिंबा ?
या वक्तव्यादरम्यान मुख्यमंत्री उपस्थित असूनही त्यांनी रमेश कराड यांना त्यांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत रोखलं नाही, यावरून रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मौनामुळे त्यांचा या वक्तव्याला पाठिंबा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढला आहे, आणि या प्रकरणी त्यांची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय म्हणाले होते रमेश कराड?
माझा मतदारसंघ (लातूर ग्रामीण) म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं आहे. आमच्या मतदारसंघात सतरंजीसुद्धा मिळत नव्हती, सभेला माणूस येत नव्हता, कुणी राम राम केलं तर त्याचा ऊस वाळवला जात होता असं वक्तव्य करत भाजप आमदार रमेश कराड यांनी नाव न घेता काँग्रसे नेते धीरज देशमुख यांच्यावर टीका केली होती. आता रोहित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.




