Jharkhand Student Protest : झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज.! काटेरी तारांचं कुंपण भेदून विधानसभेकडे कूच
राहुल गांधी म्हणाले, झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध बळाचा वापर करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे.

Jharkhand Student Protest – दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आणि त्या आंदोलनाला मोठे यश आल्यानंतर आता देशात अनेक ठिकाणी विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेविरोधात आवाज उठवू लागले आहेत. अशातच आता गेल्या आठवड्याभरापासून झारखंड राज्यातील रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये झालेली पेपरफुटी आणि गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.
लाखो विद्यार्थ्यांकडून पेपरफुटी आणि गैरव्यवहाराविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यत येत आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला काही प्रमाणात यश सुद्धा आले आहे.
मात्र, आज, सोमवारी विद्यार्थी आणि शिक्षणासंबंधित इतर मागण्यांसाठी विधानभवनाच्या निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर मोठे अडथळे निर्माण करण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांना रोखण्यात अपयश येत असल्याचे लक्षात आल्यानंतर आता विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला आहे.
जेपीएससी, जेएसएससी यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आक्रमक रुप घेतले आहे. आज सोमवारी विधानभवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थी आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी काटेरी तारांचे अडथळे उभे केले.
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला गेला. असे असूनही, विद्यार्थ्यांनी तीन अडथळे ओलांडले जगन्नाथ मंदिराजवळ पोहोचले. मात्र, या ठिकाणी विद्यार्थ्यांना थांबवण्यात आले. ज्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यांवर बसून घेतले. त्यानंतर वॉटर कॅननसह पोलीसही तैनात आहेत.
त्यापुढे सहाव्या आणि शेवटच्या अडथळ्यापाशी पोहोचल्यावर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पाण्याचे फवारे मारले, पण पांगण्याऐवजी आंदोलन करणारे विद्यार्थी नाचू लागले आणि गमछे फडकावू लागले. थोड्याच वेळात पोलिसांनी पाण्याचे फवारे बंद केले.
राहुल गांधींकडून निषेध !
झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध बळाचा वापर केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी निषेध व्यक्त केला. राहुल गांधी म्हणाले, झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध बळाचा वापर करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे.
तसेच केवळ संवादातूनच मार्ग निघू शकतो. तसेच, राज्य सरकारने आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेणे सुरू ठेवावे आणि त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विशेष म्हणजे, झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारमध्ये काँग्रेसचाही सहभाग आहे.





