खालापूर, (प्रतिनिधी) – कर्जत, खालापूरची जनता महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचा याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला आहे. त्यामुळे दीड – दोन वर्षांची सत्ता जाणार असल्याचे असे कळल्यानंतर राष्ट्रवादीचा अजित पवार यांचा पक्ष विश्वासघातकी आहे असे कर्जतचे आमदार बोलू लागले आहेत, अशी टिका शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर करत, असे वक्तव्य हे आमदारांना सुचलेले उशिराचे शहाणपण आहे, असही अहिर म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खालापूर तालुका व खोपोली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महिला आघाडीच्या संघटिका सुवर्णा जोशी, रेखा ठाकरे, कर्जत खालापूर विधानसभा संपर्कप्रमुख डॉ.सुनील पाटील, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उत्तम कोळंबे प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख, युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील, समन्वयक प्रशांत खांडेकर, शहर आधिकारी पंकज रूपवते, बाबू घारे, नितीन मोरे, विलास चालके, गजानन पाडगे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका अनिता पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अहिर म्हणाले की, येथील आमदारांना लिहावे लागते – फिक्स आमदार, त्यांना सुद्धा गॅरेंटी नाहीये. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला, त्याच राष्ट्रवादीवर टीका करत आहे. ज्यांना आमदार केले ते कार्यालय घेऊन पळून गेले, पण नव्या शिवालय कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा आमदार होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, सगळ्यांच्या पंखांमध्ये बळ आले असून नोव्हेंबरची कोणती तारीख आणि एका बोटाची किमया दाखवण्याचे बाकी राहिले आहे. यावेळी 400 हून अधिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश केला.