पाटणा : बिहारमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एनडीएच्या विजयावर तेजस्वी यादव यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिवाद करताना बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले की, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लालूजींना इतका पराभव सहन करावा लागला आहे की त्याच्या वेदना ते सहन करू शकत नाहीत. त्यांनी फक्त बिहार लुटण्याचे काम केले. तेजस्वी यांच्या वक्तव्यासंबंधीच्या प्रश्नावर चौधरी म्हणाले, इथे मोदी आणि नितीश दोघेही एक जोडी आहेत. एनडीए आहे. असेच 2005 पासून सतत राष्ट्रीय जनता दलाला पराभूत करत आहेत आणि यापुढेही असेच पराभूत करत राहणार आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाकडे आता कोणताही अजेंडा राहीलेला नाही. बिहारमध्ये विधानसभेच्या चार जागांवर पोटनिवडणूक झाली. यापैकी एनडीएने इमामगंज जागेवर आपली पकड कायम ठेवली आहे तर तारारी, रामगढ आणि बेलागंज या जागा महाआघाडीकडून हिसकावून घेतल्या आहे. बिहारमधील महाआघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान, या पराभवाबाबत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की काही जागांवर पराभव होणे ही काही मोठी गोष्ट नाही. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकांत आम्ही या जागांवर मोठी आघाडी घेतली होती. आता पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हीअधिक चांगली कामगिरी करू आणि पुन्हा आमचे सरकार स्थापन करू. यश आणि अपयश हा निवडणुकांचा एक भाग असतो. आम्ही निराश झालेलो नाही आणि आणखी एकजुटीने आम्ही निवडणूक लढवू.