प्रभात वृत्तसेवा कराड – लाडकी बहिण योजनेतून आतापर्यंत 26 लाख महिलांना वगळण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यास त्या महिलांना सरकारने मनाई केली आहे. यापूर्वी योजनेतून लाभ दिला त्यांना कोणत्या निकषाने आणि अधिकाराने सरकारने लाभ नाकारला, याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. योजनेत 4 हजार 900 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसते. ते पैसे पुरूषांनी काढले, असे सरकार म्हणते. मात्र, त्यावर काय कार्यवाही केली, याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. येथील विरंगुळा बंगला तसेच वेणूताई चव्हाण स्मारकाला सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग पाटील, शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, माजी नगरसेवक सौरभ पाटील, माजी नगराध्यक्षा अॅड. विद्याताई साळुंखे उपस्थित होत्या. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी मांडत असलेल्या वोट चोरीच्या मुद्द्याची देशातील पहिली तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राहुल गांधी दाखवत आहेत ते तक्रारीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या तक्रारीचे आहे. त्यामुळे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा कॉग्रेस पक्षाने पुढे नेला आहे. त्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. राज्य सरकारची सध्याची सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थिती अस्थिर आहे. अशा काळात विरोधक म्हणून कणखर भूमिका नेहमीच राहणार आहे. राज्य शांत राहिले पाहिजे, यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.’’ मराठासह धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच मागणी आहे. मराठासह या समाजांनाही न्याय मिळाला पाहिजे. ओबीसेचे नेते पुढे येतात, मराठा समाजाचे येत नाहीत, असे काही नाही. याउलट आरक्षणाच्या बाजूने संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात जास्त वेळा मागणी केली आहे. ती माझीच मागणी आहे. त्याचा डेटा उपलब्ध आहे. तो कोणीही तपासावा. याउलट देशभरातील सर्व समाजांच्या मागण्या एकत्रित करा. त्याचे व्यापक बिल मांडले जावे, त्यावर सविस्तर चर्चाही होऊन निर्णय व्हावा, अशी स्पष्ट भूमिका मी संसदेत घेतली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.