Labour Scam – माण तालुक्यातील विटभट्टी व्यवसाय सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. आगाऊ रकमा घेऊन कामगार अर्धवट काम सोडून पळून जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दहिवडी येथील एका विटभट्टी मालकाची सुमारे 20 लाख 77 हजार 200 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ आर्थिक फसवणूकच नव्हे, तर ऐन हंगामात कामगार गेल्यामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे लाखो रुपयांचा कच्चा माल डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहण्याची दुर्दैवी वेळ विटभट्टी मालकावर आली आहे. दहिवडी येथील भारत श्रीमंत कुंभार यांनी कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील विविध मजुरांना कामासाठी मोठी आगाऊ रक्कम दिली होती. मात्र, 30 मार्च रोजी आठवड्याचा पगार घेऊन हे सर्व मजूर कोणालाही काहीही न सांगता पसार झाले. कामगार अचानक गेल्यामुळे विटभट्टीचा चालू हंगाम पूर्णपणे ठप्प झाला आहे. सध्याच्या अवकाळी पावसाच्या वातावरणात विटांचा कच्चा माल उघड्यावर असून, तो झाकण्यासाठी किंवा सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मजूर उपलब्ध नाहीत. परिणामी, पावसामुळे हा कच्चा माल भिजून पूर्णपणे खराब झाला आहे. कर्ज काढून उभा केलेला हा व्यवसाय अशा प्रकारे उद्ध्वस्त होताना पाहून विटभट्टी मालक हवालदिल झाला असून, त्यांना सुमारे 40 ते 50 लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मजुरांनी 20 लाख 77 हजार 200 रुपये आगाऊ घेऊन कामाचा मोबदला पूर्ण केला नाही. त्यामुळे 8 प्रमुख मजुरांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधितांना तात्काळ ताब्यात घ्यावे आणि नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. माण तालुक्यातील फसवणुकीचा पॅटर्न; कारवाई कधी? विटभट्टी मालकांना गंडा घालण्याचा हा प्रकार माण तालुक्यात नवीन नाही. यापूर्वीही अनेक विटभट्टी चालकांची अशाच पद्धतीने फसवणूक झाली आहे. परराज्यातील मजूर टोळ्या करून येतात, मालकाकडून आगाऊ रक्कम घेतात आणि हंगाम जोरात असतानाच पळून जातात. या गंभीर विषयावर अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाही. त्यामुळे अशा टोळ्यांचे धाडस वाढत आहे.