Srikkanth Colombo Prediction : “कोलंबोतही श्रीलंकेचा पराभव होणार..!”, माजी खेळाडूचा दुसऱ्या कसोटीपूर्वी मोठा दावा
Srikkanth Colombo Prediction : भारताचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि थेट विधान केले आहे.

Krishnamachari Srikkanth Prediction IND vs SL Colombo Test : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गॉल कसोटीत श्रीलंकेचा १६५ धावांनी धुव्वा उडवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना २३ ऑगस्टपासून कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि थेट विधान केले आहे. श्रीलंकेचा कसोटी संघ अत्यंत सुमार दर्जाचा असून कोलंबोमध्येही त्यांचा लाजिरवाणा पराभव निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
‘श्रीलंका दुसरा सामनाही हरणार कारण…’; श्रीकांत यांचा लंकन संघावर हल्लाबोल!
आपल्या ‘चीकी चीका’ (Cheeky Cheeka) या यूट्यूब चॅनेलवर बोलताना श्रीकांत म्हणाले, “भारत दुसरी कसोटी सहज जिंकेल. कारण श्रीलंका ही अत्यंत खराब कसोटी टीम आहे. ते वनडेत बरे खेळत असतील, पण कसोटीत त्यांचा दर्जा सुमार आहे. नाणेफेक महत्त्वाची असली आणि श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली तरी ते ३५० धावा कशा उभारणार?” भारताने गॉल कसोटीत पहिल्या डावात ४६२ धावा उभारून श्रीलंकेला १९३ आणि २०६ धावांत गुंडाळले होते. विशेष म्हणजे २०१५ नंतर श्रीलंकेला भारताविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.
WTC फायनलचे भवितव्य न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मालिकेवर अवलंबून –
गॉलमधील विजयानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC 2025-27) गुणतालिकेत ५३.३३% विजयाच्या टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर आहे. श्रीकांत यांच्या मते, दक्षिण आफ्रिका जवळपास फायनलमध्ये पोहोचली असून, भारताचे अंतिम फेरीतील भवितव्य श्रीलंकेनंतर होणाऱ्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन आगामी मालिकांवर ठरेल. या दोन्ही मालिकांमध्ये भारताला विजयाची मालिका कायम राखावी लागणार आहे.
‘बुमराह नसेल तर न्यूझीलंडमध्ये संघर्ष अटळ’; वेगवान माऱ्याचे महत्त्व –
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताच्या यशाची खरी किल्ली जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ठरेल, असे श्रीकांत यांनी स्पष्ट केले. दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर असलेल्या बुमराहबद्दल बोलताना ते म्हणाले, “भारताने नेहमीच न्यूझीलंडमध्ये संघर्ष केला आहे. बुमराह संघात परतला तरच भारताला न्यूझीलंडमध्ये जिंकण्याची संधी असेल. त्याच्याशिवाय भारतीय संघाला अडचणींचा सामना करावा लागेल. भारताने २०२४-२५ मध्ये ऑस्ट्रेलियात जो दरारा निर्माण केला होता, तो केवळ बुमराहमुळेच शक्य झाला होता.”





