Koyananagar News : कोयना खोऱ्यात वन्यजीव तहानेने व्याकूळ; नैसर्गिक पाणवठे आटल्याने वन्य प्राण्यांचा थेट गावांकडे मोर्चा!
कोयना खोर्यात (Koyananagar News) सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून त्याचा सर्वाधिक फटका जंगलातील वन्यजीवांना बसत आहे.

Koyananagar News : कोयना खोर्यात (Koyananagar News) सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून त्याचा सर्वाधिक फटका जंगलातील वन्यजीवांना बसत आहे. एप्रिल-मेच्या कडक उन्हामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे पूर्णपणे आटले असून झरे, ओढे आणि तलाव कोरडे पडले आहेत. परिणामी वन्यजीव अक्षरशः तहानेने व्याकूळ होऊन पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेऊ लागले आहेत.
रात्रीच्या अंधारात रानडुकरांची टोळके आणि काही ठिकाणी बिबट्याचा वावर थेट गावांच्या उंबरठ्यावर (Koyananagar News) येऊन ठेपला आहे. शेताच्या बांधावर, विहिरीजवळ, अगदी घरांच्या कुंपणाजवळही वन्यजीव दिसू लागल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी रात्री बाहेर पडणे टाळले असून जनावरांच्या सुरक्षेबाबतही चिंता वाढली आहे.
कोयना धरणातील (Koyananagar News) उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटल्याने नदीकाठावरील पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. जंगलात पाणी नसल्याने वन्यजीवांना लांब अंतर भटकंती करावी लागत असून या दरम्यान ते मानवी वस्त्यांच्या जवळ येत आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता अधिक तीव्र होत आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी उन्हाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होत असली तरी यंदा ती अधिक गंभीर बनली आहे. जंगलातील पारंपरिक पाणवठ्यांची देखभाल, दुरुस्ती आणि कृत्रिम पाणवठ्यांची वेळेवर उभारणी झाली नसल्याने ही वेळ ओढवली आहे.
वन्यजीव संकटात असताना वन विभागाकडून (Koyananagar News) कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, वनविभागाने काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा व पाणवठे भरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा दावा केला आहे. मात्र हे प्रयत्न अत्यंत अपुरे ठरत असल्याची स्थानिकांची भावना आहे. वन्यजीव गावात येण्याआधीच जंगलात पाण्याची सोय व्हायला हवी होती, असा संताप ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.






