‘कोई मिल गया’ चित्रपटाचे एडिटर संजय वर्मा यांचे निधन; मृत्यूच्या एक दिवस आधीच मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई – बॉलीवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट एडिटर संजय वर्मा यांचे निधन झाले आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर बॉलीवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. संजय वर्मा यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. त्यांनी अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.
संजय वर्मा यांनी हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘कोई मिल गया’, सलमान-शाहरुखचा ‘करण अर्जुन’, ‘खून भरी मांग’ यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे एडिटिंग केले होते. याशिवाय त्यांनी ‘कागज’, ‘कौन मेरा कौन तेरा’, ‘कयामत से कयामत तक’, ‘मिलेंगे मिलेंगे’ ते ‘कल किसने देखा’सह या चित्रपटांसाठी काम केले होते.
संजय वर्मा यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 1996 मध्ये त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांनी 2000 मध्ये स्क्रीन अवॉर्ड आणि 2001 मध्ये आयफा अवॉर्ड देखील जिंकला आहे. संजय वर्मा यांच्या निधनाच्या एक दिवस आधी त्यांच्या शेवटच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
‘द लास्ट शो’ ला सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा 2021 मध्ये आलेला गुजराती चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पान नलिन यांनी केले होते. ऑस्करसाठीही हा चित्रपट शॉर्टलिस्ट झाला होता. हा त्यांचा शेवटचा पुरस्कार ठरला. आतापर्यंत त्यांनी साधारण 52 चित्रपटांचे एडिटींग केले आहे.





