Kidnapping Case – दीड कोटीच्या खंडणीसाठी गुलटेकडीतून व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले असून पसार झालेल्या सराइतांना गुन्हे शाखेने अटक केली. तसेच व्यापाऱ्याचीही सुखरुप सुटका केली. याप्रकरणी प्रणव बबन निवंगुणे (वय २३), शिरीष जितेद्र खोपडे (वय २६, रा. आंबेगाव पठार, धनकवडी), साहिल श्रीकांत खुटवड (वय २१, रा. भिलारेवाडी, कात्रज), सौरभ विश्वनाथ पवार (वय २७, रा. बावधन खुर्द), मंदार श्रीधर दारवटकर (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) यांना अटक झाली आहे. व्यापाऱ्याच्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार व्यापारी गुलटेकडीतील महर्षीनगर भागात राहायला आहेत. मंगळवार २४ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तक्रारदार महिलेचे पती दुकानात गेले. दुपारी घरी जेवण करण्यासाठी यायचे. मात्र, दुपारी ते घरी आले नाहीत. दुपारी एकच्या सुमारास समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करुन आरोपींनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन महिलेच्या पतीने संपर्क साधला. माझे अपहरण करण्यात आले आहे. माझ्या जिवाला धोका आहे. मला डांबून ठेवले आहे’, असे व्यापाऱ्याने पत्नीला सांगितले. अपहरण करणाऱ्या आरोपींनी पत्नीकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्यानंतर पतीची सुटका करतो, अशी धमकी दिली. घाबरलेल्या पत्नीने तक्रार दिल्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्वरीत अपहरण प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकाला दिले. त्यांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. आरोपींनी खंडणीची रक्कम मित्रमंडळ चौकात आणून देण्यास सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सापळा लावून प्रणव निवंगुणे आणि साहिल खुटवड यांना पकडले. निवंगुणे, खुटवड यांचे साथीदार व्यापाऱ्याला घेऊन खेड शिवापूर परिसरात मोटारीतून गेल्याची माहिती मिळाली. खोपडे, पवार, दारवटकर यांना खेड शिवापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या तावडीतून व्यापाऱ्याची सुखरुप सुटका करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींना स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, प्रशांत अन्नछत्रे, अजित जाधव, सहायक निरीक्षक अमोल रसाळ आणि पथकाने ही कारवाई केली.