Khushboo Patani: महिलांविषयीच्या विधानावर खुशबू पटानी संतापली; अनिरुद्धाचार्य यांच्यावर ताशेरे, अनुयायांनाही सुनावलं

Khushboo Patani: अभिनेत्री दिशा पटानी हिची बहीण आणि माजी सैन्याधिकारी खुशबू पटानी हिने अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य यांच्यावर महिलांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत खुशबू हिने बाबाच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, त्यांच्या अनुयायांना ‘कमकुवत’ असेही संबोधले आहे.
बाबा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यात म्हटलं होतं की, “२५ वर्षांवरील मुली लग्नासाठी योग्य नाहीत कारण त्या बहुधा अनेक पुरुषांमध्ये गुंतलेल्या असतात.” या विधानामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली असून अनेक महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही सुरू केलं आहे.
खुशबू पटानीने आपल्या व्हिडीओत म्हटलं, “तो म्हणतो की २५ वर्षांवरील मुली ‘चार ठिकाणी तोंड मारून’ येतात. जर तो माझ्यासमोर असता, तर मी त्याला त्याने वापरलेल्या शब्दांचा अर्थ नीट समजावून दिला असता. हे केवळ महिलांविरोधातच नव्हे, तर राष्ट्रविरोधीही आहे.”
तिने प्रश्न उपस्थित केला की, “तो मुलींविषयी बोलला, पण त्या ‘लिव्ह-इन’मध्ये असलेल्या मुलांबद्दल का नाही बोलला? दोन प्रौढ व्यक्तींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, तर त्यात चुकीचं काय?”
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी खुशबूच्या वापरलेल्या भाषेवर टीका केली, तर काहींनी तिच्या भूमिकेचं समर्थन केलं. दरम्यान, स्वामी प्रेमानंद महाराज यांचाही एक जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये त्यांनीही मुला-मुलींच्या आचारधर्मावर आणि ‘लिव्ह-इन’ नात्यांवर टीका केली होती.
यानंतर सोशल मीडियावर खुशबू पटानी प्रेमानंद महाराजांवरही बोलल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, तिने त्वरित स्पष्टीकरण देत आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत लिहिलं ,”प्रेमानंद महाराजांविषयी मी काहीही म्हटलेलं नाही. माझं विधान हे केवळ अनिरुद्धाचार्य यांच्या महिलांविरोधातील वक्तव्यावर प्रतिक्रिया म्हणून होतं. कृपया चुकीचा प्रचार करू नका.”
या वादामुळे अध्यात्मिक गुरूंच्या वक्तव्यांवर पुन्हा एकदा चर्चेची ठिणगी पडली असून, समाजातील स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.





