Khed News – खेड तालुक्यातील नाणेकरवाडी, वाकी खुर्द आणि आंबेठाण येथील बौद्ध कुटुंबीयांच्या जमिनीच्या फेरफारमध्ये बेकायदेशीर बदल केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने खेड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) तालुका संपर्क प्रमुख नितीन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, दोषी महसूल अधिकारी आणि भूखंड माफियांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या महार वतन जमिनी संदर्भात कोणताही व्यवहार किंवा वैध आदेश नसताना तलाठी व तत्कालीन मंडल अधिकारी यांच्या संगनमताने फेरफार क्र. ५९९७ नोंदवून ७/१२ उताऱ्यावरून नावे कमी केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. वाकी खुर्द येथील गट क्र. १ संदर्भात महसूल कायद्याचे उल्लंघन करून मुदतबाह्य हरकत स्वीकारल्याने बौद्ध कुटुंबावर अन्याय झाला आहे, तर आंबेठाण येथील गट नं. १५७ चा फेरफार क्र. ५७३१ जमीनमालकांना कोणतीही नोटीस न देता मंजूर करण्यात आल्याने तो बेकायदेशीर ठरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात आरपीआयचे तालुकाध्यक्ष दिलीप नाईकनवरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रांत आल्हाट, तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ सोनवणे, विशाल खंडागळे, प्रीती गायकवाड, स्वाती गायकवाड, पीडित शेतकरी सागर काळे, अजित गोतरणे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही आणि अन्यायकारक फेरफार रद्द होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा रिपब्लिकन पक्षाने घेतला आहे.