मुंबई – “मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं. मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि मी मुख्यमंत्री झालो. आता मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहिल, हे ही माझं स्वप्न आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आता त्यांच्या या विधानावरून विरोधी पक्षातील नेत्यांकडून चांगलीच टीका होत आहे.
त्यांच्या या विधानावर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे की,’त्यांचीही काही (सु)प्रिय स्वप्नं आहेतच की #मुख्यमंत्री बनण्याचं आपल स्वप्न नव्हतं. मुख्यमंत्री होईन असंही वाटलं नव्हतं, असा दावा #वर्क_फ्रॅाम_होम फेम मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी आज केलाय. पण तुमची मुख्यमंत्री होण्याची अनेक वर्षांपासून सुप्त इच्छा होती. हे सर्वांनाच माहिती आहे. बाकी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवल्याबद्दल तुम्ही थोरल्या पवार साहेबांचे आभार मानले पाहिजेत.
यापुढे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत राहिला पाहिजे, असंही स्वप्न तुम्ही पाहताय म्हणे. मुळात त्यासाठी विश्वासघाताने नाही तर स्वबळावर आमदार निवडून आणावे लागतात किंवा तसं स्वप्न पाहण्यासाठी तुम्ही पवार साहेबांची परवानगी घेतलीय का? नाहीतर असं काही थोरले पवार कोपले तर पाच वर्षे पूर्ण करणंही कठीण व्हायचं, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचीही काही (सु)प्रिय स्वप्नं आहेतच की! बाकी आता कुणी कितीही स्वप्नं पाहिली तरी पुढचा मुख्यमंत्री राज्यातील जनताच ठरवणार आहे आणि यावेळी मतदार निकालानंतर तिघाड्या तयार होणार नाहीत याचीही खबरदारी घेईल एवढं लक्षात ठेवा!!!” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.