पिंपरी (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे दिवसातून 4 वेळा निर्जंतुकीकरण करावे अथवा स्वच्छ ठेवण्यात यावे. महापालिका याबाबत आवश्यक दक्षता घेऊ शकत नसल्यास सर्व लहान-मोठे स्वच्छतागृह कुलूप लावून 3 मे पर्यंत बंद करावे, अशी मागणी अँटी कोरोना टास्क फोर्सच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
अँटी कोरोना टास्क फोर्सच्या (महाराष्ट्र व गोवा) अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, सल्लागार तथा ईसीएचे चेअरमन विकास पाटील यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासन आवश्यक ती सकारात्मक पावले उचलत आहे.
अद्यापही सर्वसामान्य जनता कठीण परिस्थितीशी झुंजत आहे. गरजू व पीडित नागरिकांना मदत करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांना गस्तीच्या ठिकाणाजवळ स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हायला हवे. त्याचबरोबर त्यांना ग्लुकोज पावडर द्यायला हवी.