Kailash Mansarovar Yatra : कैलास-मानसरोवर यात्रा लवकरच होणार सुरू

नवी दिल्ली : लवकरच कैलास मानसरोवर यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. भारत आणि चीनच्या प्रतिनिधींनी मंगळवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि मानसरोवर यात्रेसह अनेक मुद्द्यांवर आढावा बैठक घेतली. या बैठकीत कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा लवकरात लवकर सुरू करण्यावर चर्चा झाली. 2020 मध्ये सीमेवर वाढलेल्या तणावामुळे यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.
या बैठकीचा मुख्य मुद्दा मानसरोवर यात्रा होता. अलीकडेच परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, यावर्षी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यावर एकमत झाले आहे, परंतु त्याची रुपरेषा ठरविणे बाकी आहे. भारत-चीन सीमा मुद्द्यांवरील सल्ला आणि समन्वयच्या 33 व्या बैठकीदरम्यान ही चर्चा झाली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयातील सहसचिव (पूर्व आशिया) गौरांगलाल दास यांनी केले, तर चीनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि महासागर व्यवहार विभागाचे महासंचालक हाँग लियांग यांनी केले.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बैठक सकारात्मक आणि रचनात्मक वातावरणात झाली आणि दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा व्यापक आढावा घेतला. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या विशेष प्रतिनिधींच्या पुढील बैठकीसाठी ठोस तयारी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्र काम करण्यावर सहमती दर्शवली, असेही निवेदनात म्हटले आहे.





