Junnar News – गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथील स्मशानभूमीत एका धक्कादायक आणि विचित्र प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील उद्योजक रामदास गंगाधर गुंजाळ यांच्या अंत्यविधीनंतर त्यांच्या अस्थी (रक्षा) उचलण्यासाठी कुटुंबीय स्मशानभूमीत गेले असता, त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी मांसाहारी नैवेद्य ठेवलेला आढळून आला. या प्रकारामुळे गावात जादूटोणा किंवा अघोरी कृत्ये केली जात असल्याचा संशय व्यक्त होत असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामदास गुंजाळ यांचा शनिवारी (दि. २१) अंत्यविधी पार पडल्यानंतर रविवारी (दि. २२) सावडण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. २२) कुटुंबीय रक्षा उचलण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले असता, ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले होते. तिथे भाकरीवर एखाद्या प्राण्याचे काळीज आणि अंडी ठेवलेली दिसली. हा प्रकार पाहून कुटुंबीयांसह उपस्थित ग्रामस्थ हादरले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, हा प्रकार अंधश्रद्धेशी संबंधित आहे की कुणी हेतुपुरस्सर केलेला खोडसाळपणा, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. संबंधित कुटुंबीयांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करत असून, दोषींचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. दरम्यान, स्मशानभूमीसारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या निंदनीय प्रकारामुळे गुंजाळवाडीतील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.