Junnar News – मार्च महिना सुरू होताच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. अचानक वाढलेल्या तापमानामुळे दूध उत्पादक आणि फळ बागायतदार शेतकरी चिंतेत पडले आहेत. विशेषतः द्राक्ष, आंबे आणि डाळिंब उत्पादक आपल्या बागांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. साकोरी (ता. जुन्नर) येथील प्रगतशील डाळिंब बागायतदार पांडुरंग साळवे यांनी आपल्या २५ एकर डाळिंब बागेला उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी चक्क शेडनेटचे आच्छादन घातले आहे. तीव्र उन्हामुळे डाळिंबाची झाडे कोमेजायला लागली असून फुले व फळांची मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे पांडुरंग साळवे यांनी सांगितले. यापूर्वी काही महिने ढगाळ वातावरण असल्याने आधीच फुलगळतीची समस्या निर्माण झाली होती. त्या काळात बागा वाचवण्यासाठी औषध फवारणीवर मोठा खर्च करावा लागला. २५ एकर क्षेत्रासाठी एका फवारणीला किमान ९० हजार रुपये खर्च येतो, अशी माहिती पांडुरंग यांचे सुपुत्र शहाजी साळवे यांनी दिली. आता उन्हाळ्यामुळे बागेचे अस्तित्व टिकवण्यासाठी साळवे पिता-पुत्रांनी हे शेडनेटचे पांघरून घालण्याचा निर्णय घेतला आहे. साळवे कुटुंबाने राबविलेली ही शेडनेटची कल्पना सध्या साकोरी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक बागायतदारांना ही पद्धत पटली असून, आता आजूबाजूचे शेतकरी देखील आपल्या बागांचे संरक्षण करण्यासाठी अशाच प्रकारचे आच्छादन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी लढवलेली ही शक्कल कौतुकास्पद ठरत असली तरी, आर्थिक भार मात्र वाढला आहे. तब्बल १० लाखाचे शेडनेट वापरले.. मागील काही महिने खराब हवामानामुळे खत आणि औषधोपचारांवर मोठा खर्च झाला होता. त्यातून सावरून फुलगळती कमी होत असतानाच आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हापासून झाडांचे आणि फळांचे संरक्षण करण्यासाठी अक्षय साळवे यांनी सांगितले की, २५ एकर क्षेत्रासाठी तब्बल १० लाख रुपये किमतीचे शेडनेट वापरून बागेवर आच्छादन करण्यात आले आहे. हा खर्च अनाठायी असला तरी बाग वाचवण्यासाठी तो अनिवार्य ठरला आहे. खर्च आणि नफा यांचा ताळमेळ बसेना… फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक खर्च करावा लागत आहे. मात्र, दुसरीकडे बाजारात फळांना मिळणारा भाव हा अतिशय अल्प किंवा कवडीमोल असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे, अशी खंत पांडुरंग साळवे यांनी व्यक्त केली. उत्पादन खर्च आणि मिळणारा नफा यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाल्याचे त्यांनी नमूद केले.