ठाणे : आज जे शिवसेनेत गेले आहेत, ते आधी भाजपमध्ये जाणार, असं ठरलं होतं. पण ते अचानक शिवसेनेत कसे गेले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. मागील आठवड्यात कळव्यात शरद पवार पक्षाच्या सात माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर कळव्यात शरद पवार गटाचे प्रकाश पाटील यांच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी या माजी नगरसेवकांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, एक गावाचा प्रधान असतो, गावकरी त्याच्यावर प्रेम करत असतात, त्यांच्या अडीअडचणीत प्रधान कामाला जात असतो. परंतु मुलीच्या लग्नाच्या दिवशी गावात आग लागते आणि प्रधान तिकडे धावत जातो. जाताना मुनीमच्या खांद्यावर लग्नात येणाऱ्यांची जबाबदारी देतो. तेव्हा लग्नात येणारे सर्वच त्याला मानसन्मान देतात. तेव्हा त्याला आपणच प्रधान झाल्याचा भास होतो. मात्र, जेव्हा प्रधान येतो तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे जातात. यातून मुनीम हा केव्हाही प्रधान होत नसतो, हे लक्षात ठेवावे, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली आहे. मिलिंद पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आणि कळवा-खारेगाव परिसरात प्रभावशाली मानले जाणारे मिलिंद पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे शिंदे गटासाठी मोठं बळ मानलं जात असतानाच, दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांसाठी हा एक राजकीय धक्का मानला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी येथे मिलिंद पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मिलिंद पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील राजकारणाला मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीत कळवा आणि खारेगाव सारख्या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.