Ram Mandir Ayodhya : राम मंदिर ट्रस्टचा ऐतिहासिक निर्णय! निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा बनले पहिले ‘सीईओ’; नेमकी जबाबदारी काय असणार?
Ram Mandir Ayodhya : अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची पहिल्या CEOपदी नियुक्ती होण्याची शक्यता. ट्रस्ट डीडमध्येही बदल होणार.

Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. बुधवारी झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ट्रस्टच्या कामकाजात व्यावसायिकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी CEO पदाची निर्मिती करण्यात आली आहे.
एअर मार्शल जितेंद्र मिश्रा हे भारतीय हवाई दलातील माजी फायटर पायलट आहेत. त्यांनी हवाई दलात 39 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आहे. जानेवारी 2025 मध्ये त्यांनी वेस्टर्न एअर कमांडची जबाबदारी स्वीकारली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळातही त्यांनी या कमांडचे नेतृत्व केले.
कोण आहेत एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?
जितेंद्र मिश्रा यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी 38 वर्षांहून अधिक सेवा बजावली असून, ते Fighter Combat Leader आणि Experimental Test Pilot आहेत. त्यांच्या नावावर 3,000 हून अधिक तासांचे उड्डाण अनुभव आहे.
मिश्रा यांनी पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकादमी, बंगळुरूतील एअर फोर्स टेस्ट पायलट्स स्कूल, अमेरिकेतील एअर कमांड अँड स्टाफ कॉलेज आणि ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज येथे प्रशिक्षण घेतले आहे.
कारकिर्दीत त्यांनी फायटर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर, Aircraft & Systems Testing Establishment (ASTE) चे चीफ टेस्ट पायलट आणि दोन महत्त्वाच्या फायटर एअरबेसचे एअर ऑफिसर कमांडिंग यांसह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.
तसेच त्यांनी एअर हेडक्वार्टर्समध्ये ऑपरेशनल प्लॅनिंग अँड असेसमेंट ग्रुपचे संचालक, प्रिन्सिपल डायरेक्टर (ASR) आणि असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ (Projects) म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यानंतर ASTE चे कमांडंट, डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (Doctrine, Organisation and Training) आणि डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (Operations) अशी पदे त्यांनी भूषवली.
जानेवारी 2025 मध्ये ते वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख झाले. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांविरोधात करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान कमांडचे नेतृत्व केले. त्यांना अति विशिष्ट सेवा पदक (AVSM) आणि विशिष्ट सेवा पदक (VSM) प्रदान करण्यात आले आहे.
5,585 अर्जांमधून 3 नावे शॉर्टलिस्ट
CEO निवडीची प्रक्रिया 6 जुलैपासून सुरू झाली होती. निवड समितीने तब्बल 5,585 अर्जांची छाननी करून 111 उमेदवारांना ऑनलाइन मुलाखतीसाठी निवडले. त्यानंतर 16 उमेदवारांना अयोध्येत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावण्यात आले.
निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली यांच्या अध्यक्षतेखालील समितीत निवृत्त लेफ्टनंट जनरल व्ही. के. चतुर्वेदी आणि शास्त्रज्ञ-उद्योजक सुरेश हावरे यांचा समावेश होता. समितीने तीन उमेदवारांची अंतिम यादी तयार करून ती बंद लिफाफ्यात ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास महाराज यांच्याकडे सोपवली होती. त्यातून जितेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली.
CEOकडे मोठे अधिकार
ट्रस्टच्या बैठकीतील 12 कलमी अजेंड्यात CEOच्या अधिकारांबाबत ट्रस्ट डीडमध्ये बदल करण्याचाही प्रस्ताव होता. CEOकडे वैधानिक, प्रशासकीय आणि आर्थिक कामकाजाची जबाबदारी राहणार आहे. संस्थेच्या दीर्घकालीन योजना, कार्यपद्धती, प्रशासकीय व्यवस्था आणि नियामक नियमांचे पालन यावरही त्यांचे नियंत्रण असेल.
राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिराच्या कामकाजासाठी पूर्णवेळ CEO आवश्यक असल्याचे म्हटले आहे. CEO सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय काम करेल आणि ट्रस्टच्या महासचिवांना अहवाल देईल.
सुरक्षा समिती आणि देणगी प्रकरणही चर्चेत
ट्रस्ट मंदिराच्या सुरक्षेसाठी महासचिवांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी स्थानिक सुरक्षा समन्वय समिती स्थापन करण्याचा विचार करत आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अधिकृत प्रवक्त्याच्या नियुक्तीचाही विषय बैठकीत आहे.
दरम्यान, मंदिराच्या देणग्यांमध्ये कथित अनियमितता आणि देणगी चोरीप्रकरणी सुरू असलेल्या SIT तपासाचा आढावाही घेतला जाणार आहे. 26 जून रोजी चंपत राय आणि ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला होता. त्याच्या एक दिवस आधी उत्तर प्रदेश पोलिसांनी मंदिरासाठी आलेल्या देणग्यांशी संबंधित कथित अनियमिततेप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
त्यामुळे पहिल्या CEOची नियुक्ती आणि ट्रस्ट डीडमधील प्रस्तावित बदल हे राम मंदिराच्या आगामी प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.





