Jaykumar Gore – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातून खऱ्या अर्थाने क्रांती झाली. तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी हे सरकार सदैव तत्पर आहे. त्यामुळे मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा येथे व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सातारा शासकीय विश्रामगृहात मंत्री गोरे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. आंबेडकरांना अभिवादन करून त्यांची प्रतिमा स्वीकारत मंत्री गोरे यांनी समतेचा नारा दिला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे नेते रमेश अनिल उबाळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांची मूर्ती व निळा गमछा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. युवा नेते नितीन शिंदे व रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ‘‘जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी सर्वच मागासवर्गीयांनी कोणत्याही भूलथापाला बळी न पडता साथ दिली आहे. लोकसभा, विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश मिळाले आहे. आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संविधानाच्या माध्यमातून सत्ता मिळवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे,’’ असे गोरे यांनी सांगितले. रिपब्लिकन सेनेचे युवा नेते रमेश अनिल उबाळे आंदोलनातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. त्यांना भविष्यात खूप मोठी संधी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामविकास मंत्री म्हणून रिपब्लिकन सेनेला यापुढे ताकद दिली जाईल असा विश्वास त्यांनी दिला. महायुतीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, चिराग पासवान, प्रा. जोगेंद्र कवाडे, युवा नेते जयदीप कवाडे, रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर, युवा नेते अमन आंबेडकर, डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी अशा सर्वांची साथ मिळाल्यामुळे सध्या सर्वत्र महायुतीच सत्तेमध्ये आहे याची आम्हाला जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले.