Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंनी शब्द पाळला! औंध सिंचन योजनेत आणखी ५ गावांचा समावेश, २१ गावांच्या दुष्काळमुक्तीचा मार्ग मोकळा

प्रभात वृत्तसेवा
सातारा – खटाव तालुक्यातील औंध उपसा सिंचन योजनेत नव्याने पाच गावांचा समावेश झाल्याने आता ही योजना एकूण २१ गावांसाठी लाभदायी ठरणार आहे. पाच वाढीव गावांचा गावांचा औंध योजनेत समावेश करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाचे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना प्राप्त झाले आहे. ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन या योजनेसाठी विविध मान्यताही मिळवल्या आहेत.
औंध उपसा सिंचन योजनेत वंचित पाच गावांचा समावेश करण्याचा शब्द ना. जयकुमार गोरे यांनी येथील जनतेला दिला होता. या योजनेसाठी त्यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले आहेत. येथील स्थानिक शिष्टमंडळाची मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि राज्यपालांबरोबर बैठक घेऊन ना. गोरे यांनी या योजनेच्या प्रस्तावाला गती देण्याचे प्रयत्न केले होते.
पाच वाढीव गावांसह आता या योजनेत औंध, त्रिमली, कुमठे, गणेशवाडी, जायगाव, नांदोशी, गोपूज, करांडेवाडी, खबालवाडी, गोसाव्याचीवाडी, पळशी, लांडेवाडी, वरुड, खरशिंगे, अंभेरी, वाकळवाडी, कोकराळे, भोसरे, लोणी,धकटवाडी आणि सिध्देश्वर कुरोली या २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे.औंध उपसा सिंचन योजनेद्वारे औंध परिसरातील गावांना शेतीसाठी पाणी देण्यासाठी कण्हेर जलाशयातून सव्वा टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.
या पाण्याद्वारे ८,८८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेसाठी पाणी उपलब्धतता झाली असून उर्ध्वगामी नलिका, पंप विसर्ग, पूर्व संभाव्यता अहवाल, पंपिंग मशिनरी, परिगणाकांना स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळून प्रकल्पाची पीक रचनाही मान्य करण्यात आली आहे.
४९३ कोटींचा खर्च अपेक्षित..
सदर प्रकल्पासाठी ४९३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने जून २०२४ मध्ये या योजनेला मान्यता दिली आहे. राज्यपालांनी मान्यता दिलेल्या या योजनेत पाच वाढीव गावांचा समावेश करुन एकूण २१ गावांच्या योजनेस ८ ऑक्टोबर २०२५ रोजी शासनाची मान्यता मिळाल्याचे पत्र जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मान्यता मिळताच या योजनेच्या निविदा प्रक्रियेची पुढील करण्यात येणार असल्याचे ना. जयकुमार गोरे यांनी सांगितले.
“२००९ पासून माण-खटावमधील दुष्काळमुक्तीचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. उरमोडी, जिहेकठापूर, तारळी योजनांचे पाणी मतदारसंघात येत आहे. आता टेंभू योजनेची कामे वेगाने सुरु आहेत. वाढीव आंधळी उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला गेली आहे. जल फेरनियोजनात जिहेकठापूर योजनेला वाढीव पाणी मिळवले आहे. त्यातून माणमधील वंचित गावे सिंचनाखाली येणार आहेत. दुष्काळमुक्तीच्या लढाईतील अंतिम टप्पा म्हणजे औंध उपसा सिंचन योजना आहे. आता ही योजनाही मार्गी लागत असल्याने मतदारसंघ खऱ्या अर्थाने दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करु लागला आहे. विविध योजनांचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यासाठीही मी कटिबद्ध आहे.”
– ना. जयकुमार गोरे, मंत्री – ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग





