NCP Merge : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी विधान भवनात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, विलीनीकरणाची शक्यता आता पूर्णपणे संपली असून, हा विषय आता आमच्या अजेंड्यावर नाही. जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, विलीनीकरणाचा विचार हा प्रामुख्याने अजित पवार यांच्या विचारांमधून आला होता आणि ते दोन्ही पक्षांशी यावर चर्चा करत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर आता ही प्रक्रिया थांबली आहे. भविष्यात या चर्चा पुन्हा सुरू होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. राज्यसभेच्या सातव्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच पाटील यांनी हे विधान केले आहे. विलीनीकरणाच्या शक्यतेमुळे काँग्रेस आणि ठाकरेसेना धास्तावले होते. जर विलीनीकरण झाले असते, तर शरद पवारांना निवडून देणे म्हणजे ती जागा अप्रत्यक्षपणे एनडीएला देण्यासारखे होईल, अशी भीती मित्रपक्षांना होती. ही शंका दूर करण्यासाठीच राष्ट्रवादीने (शप) विलीनीकरणाचा विषय संपल्याचे जाहीर केले आहे.