प्रभात वृत्तसेवा जामखेड ( ओंकार दळवी ) – जामखेड नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीमुळे जामखेडच्या राजकारणात वेगाने घडामोडी सुरू झाल्या आहेत. प्रमुख पक्षातील अनुभवी माजी नगरसेवक व पदाधिकारी हे तिकिटापासून महत्त्वाच्या पदासाठी आतापासून पक्षाच्या वरिष्ठांकडे ”लॉबिंग’ करत असल्याची चर्चा आहे. यासाठी स्थानिक, तसेच मर्जीतील नेत्यांकडे आग्रह धरला जात आहे.आरक्षणात “सेफ’ प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक दिग्गज इच्छुकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अनेक जण कुटुंबातील महिलेला रिंगणात उतरवण्याची तयारी करत आहेत, तर काही जण दुसऱ्या प्रभागाची चाचपणी करत आहेत. यामुळे वरिष्ठांकडे अनेकांच्या चकरा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सन २०१६च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. सुरेश धस यांनी आ. राम शिंदे यांचा दारूण पराभव केला होता. हा पराभव प्रा. शिंदे यांच्या जिव्हारी लागला होता. त्यावेळेस प्रा. शिंदे १२ खात्याचे मंत्री असतानाही भाजपला फक्त ३ जागा मिळविण्यात यश आले होते. त्यावेळेस तिसऱ्या स्थानिक आघाडीचा फटका भाजपला बसला होता. तिसऱ्या आघाडीने सरासरी १०० ते १५० मते घेतल्याने पराभवाची चव भाजपला चाखावी लागली होती. या निवडणुकीत तरी तिसरी आघाडी रोखण्यात सभापती प्रा. राम शिंदे व आ. रोहित पवार यांना यश येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा आतापासूनच अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुक तिकिटासाठी फिल्डींग लावून आहेत. नगराध्यक्ष व इतर प्रमुख पदांसाठी अनेक जणांनी शहरातील लोकप्रतिनिधींपासून वरिष्ठ नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांकडे जोर लावला आहे. त्या पदासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपली नावे पुढे केली जात आहेत. ”मी कसा योग्य’ हे नेत्यांना समजावून सांगितले जात आहे. तसेच, पक्षातील विरोधातील प्रबळ इच्छुकाला पद मिळू नये, यासाठीही फिल्डींग लावून अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. नगराध्यक्ष पदासाठी सत्तेतील भाजपा तसेच, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात अनेक जण इच्छुक आहे. तसेच, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), काँग्रेस व इतर पक्षांतील इच्छुकही त्या मानाच्या पदासाठी तयारी करीत आहेत. ते मानाचे पद मलाच मिळायला हवे. दांडगा अनुभव, पक्षासाठी केलेली कामे पाहता पद हवे, अशी आग्रही मागणी स्थानिकपासून राज्यपातळीवरील नेत्यांकडे केली जात आहे. युती व आघाडीबाबत संभ्रम.. नगरपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी एकत्रितपणे निवडणूक लढणार की स्वतंत्रपणे, याची उत्सुकता लागली आहे. लोकसभा व विधानसभेत युती व आघाडी झाली होती. नगरपरिषद निवडणुकीत माजी नगरसेवक व इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रमुख पक्षात तर, इच्छुकांची रांग लागली आहे. त्यामुळे युती व आघाडी न करता निवडणूक लढावी, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत आहे. तसेच, वरिष्ठांकडून अद्याप स्पष्ट संकेत दिले जात नसल्याने युती व आघाडीबाबत इच्छुकांमध्ये संभम निर्माण झाला आहे.