जांबूत – विद्यार्थ्यांनी जीवन जगताना सतत आत्मपरीक्षण करत राहावे आणि आपल्या शाळेशी नाते कायम ठेवून सिंहावलोकन करावे असे प्रेरणादायी विचार जय मल्हार विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व डीसीएम संस्थेचे संचालक शिवाजी धायगुडे यांनी व्यक्त केले. इयत्ता १० वी (सन २००७–०८) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या मेळाव्यास ७० हून अधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ११ कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांनी उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल जाधव यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक आर. एस. कापसे, पांडुरंग आंधळे, सतीश फिरोदिया, रमेश अर्जुन, प्रकाश माने, विष्णू शिरतार, मंदाकिनी पुजारी, शुभांगी माने, युवराज जगताप, लहू जोरी, कैलास शिंदे, जालिंदर राऊत आदींची उपस्थिती होती. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले अधिकारी, उद्योजक, प्रगतशील शेतकरी तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला. महाराष्ट्र पोलीस दलातील योगेश पळसकर यांनी शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जीवनात प्रगती साधता आल्याचे सांगितले. तर सोमनाथ चव्हाण यांनी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आपण नकला सादर करणारे कलाकार बनल्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण केले. तसेच शाळेसाठी स्मृतीचिन्ह, डिजिटल बोर्ड, स्मार्ट टीव्ही संच आदी साहित्य भेट देण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वरूपात मदत करण्याची घोषणाही केली. स्नेहमेळाव्यामुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीचे बंध अधिक दृढ झाले असून, भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश पारखे यांनी केले, प्रास्ताविक गोरक्ष गाजरे यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन भास्कर गांजे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे माजी इंग्रजी शिक्षक स्वर्गीय गंगाधर शेळके तसेच कर्मचारी परशुराम सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.