Ayodhya Ram Mandir Daan Chori : मुख्यमंत्र्यांचा हा दौरा चौकशीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न तर नाही ना? अखिलेश यादवांचा योगींवर निशाणा
राम मंदिराच्या देणगीत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केल्यानंतर, राम जन्मभूमी ट्रस्टच्याच विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी ३ सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे.

Ayodhya Ram Mandir Daan Chori – अयोध्येतील राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणाच्या एसआयटी चौकशीदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा चौकशीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत योगी यांच्यावर अनेक गंभीर प्रश्न डागले. एसआटीचे कामकाज सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः तिथे जाऊन पाहणी करणे म्हणजे चौकशी प्रभावित करण्याचा प्रयत्न वाटतो.
हा दौरा अचानक का ठरवण्यात आला? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच योगींच्या भाषणात नेहमीसारखा आत्मविश्वास दिसला नाही आणि त्यांचा चेहरा उतरलेला होता, अशी टीकाही त्यांनी केली.
अखिलेश यादव म्हणाले की, केवळ दूध का दूध आणि पाणी का पाणी करून चालणार नाही, तर देवाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीचा आणि हिऱ्या-मोत्यांचाही संपूर्ण हिशोब जनतेला द्यावा लागेल.
या वादावर अयोध्येतील एका सभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. ते म्हणाले, जर राम मंदिरासाठी देशाला ५०० वर्षे प्रतीक्षा करावी लागली, तर एसआयटी चौकशीचे सत्य समोर येण्यासाठी लोक आणखी १५ दिवस थांबू शकतात.
काही लोक अयोध्या आणि राम जन्मभूमी ट्रस्टला बदनाम करण्याचा कट रचत आहेत. ट्रस्टच्या विनंतीवरूनच आम्ही ही चौकशी लावली असून पूर्ण सत्य समोर येईल.
राम मंदिराच्या देणगीत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केल्यानंतर, राम जन्मभूमी ट्रस्टच्याच विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी ३ सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे.





