Pune District : गायमुख फाटा–शिक्रापूर सिमेंट रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांचे गंभीर आरोप; निकृष्ट दर्जामुळे संताप
Pune District : त्यातच, काठापूर येथील मुख्य चौकात ठेकेदाराने चक्क रस्त्यावरच मातीचा मोठा ढिगारा टाकून ठेवल्याने वाहनचालक आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

जांबुत : शिरूर -आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मार्ग असलेल्या आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (MSIDC) माध्यमातून सुरू असलेल्या गायमुख फाटा ते अवसरी- पारगाव- पिंपरखेड- शिक्रापूर या मार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामावर काठापूर खुर्द (ता.शिरूर ) येथील ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
रस्त्याच्या साईड पट्टीच्या भरावासाठी दर्जाहीन मातीमिश्रित मुरूम वापरला जात असून काठापूर खुर्द येथील चौकात मातीचा ढिगारा टाकल्याने ठेकेदाराच्या कामाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तब्ब्ल ४१६ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध असतानाही या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यातच, काठापूर येथील मुख्य चौकात ठेकेदाराने चक्क रस्त्यावरच मातीचा मोठा ढिगारा टाकून ठेवल्याने वाहनचालक आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. साईड पट्टीच्या कामासाठी दर्जेदार मुरूम वापरणे अपेक्षित असताना, त्याऐवजी मातीमिश्रित मुरूम टाकून कामात हलगर्जीपणा केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या साईड पट्टीच्या भरणीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. ४१६ कोटींच्या निधीतून होत असलेल्या या कामात जर अशी अनास्था असेल, तर या रस्त्याचे आयुष्य किती असेल? असा संतप्त सवाल काठापूर ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.ओढ्यावर पुलाचे काम करण्यासाठी खोदकाम करून दीड वर्ष उलटून देखील आता पुन्हा पावसाळा सुरू झाला तरी पुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने पर्यायी मार्गावरून तारेवरची कसरत करत पाणी साचलेल्या खड्ड्यातून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ दाते यांनी सांगितले.
काठापूर खु.येथील चौकात टाकलेला मातीचा ढिगारा तत्काळ हटवून रस्ता मोकळा करावा. साईड पट्टीच्या कामासाठी निकृष्ट मातीऐवजी नियमाप्रमाणे दर्जेदार मुरूमच वापरावा. या रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष असून संबंधित ठेकेदाराच्या या कामाची चौकशी करून गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी माजी उपसरपंच राजेंद्र दाते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामदास कानसकर, शालेय समितीचे अध्यक्ष जयसिंग दाते, अजित कानसकर,भानुदास दाते, रामा दाते आणि काठापूर ग्रामस्थांनी केली आहे.





