Iran-Israel War : मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली असून, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाने (Iran-Israel War ) भीषण रूप धारण केले आहे. अमेरिकेनेही या संघर्षात सक्रिय सहभाग घेतला असून, इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या झाली आहे. या घटनेनंतर इराणने प्रत्युत्तरादाखल होर्मुजच्या खाडीला बंद केले असून, जगभरातील तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊन त्या १०० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त होण्याची भीती आहे, ज्याचा थेट परिणाम भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर होणार आहे. खामेनेई यांच्या हत्येनंतर युद्ध अधिक तीव्र शनिवारी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले, ज्यात तेहरानमधील खामेनेई यांचे कार्यालय लक्ष्य करण्यात आले. इराणच्या राज्य माध्यमांनी रविवारी खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी केली असून, त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही या हल्ल्यात ठार झाल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलने “तेहरानच्या हृदयस्थळी” नवीन हल्ल्यांची लाट सुरू केली असून, इराणने “प्रतिशोध हा आमचा कायदेशीर हक्क आणि कर्तव्य” असल्याचे घोषित केले आहे. इराणने इस्रायल, अमेरिकन लष्करी तळ आणि आखाती देशांतील अनेक ठिकाणांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले आहेत. ज्यात दुबई, अबू धाबी, बहारीन, कुवेत आणि कतार येथील हवाईतळ आणि शहरांवर हल्ले झाल्याच्या बातम्या आहेत. होर्मुज खाडी बंद: जगाच्या तेल पुरवठ्यावर धोका होर्मुजची खाडी ही जगातील सर्वात महत्त्वाची समुद्री मार्ग आहे. ज्याद्वारे जगभरातील सुमारे २० टक्के कच्चे तेल आणि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू वाहतूक होते. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने जहाजांना खाडीतून जाण्यास मज्जाव केला असून, “कोणतेही जहाज परवानगीशिवाय जाऊ शकत नाही” असे संदेश पाठवले जात आहेत. यामुळे तेल टँकरांची वाहतूक थांबली असून, शिपिंग कंपन्यांनी खाडी टाळण्याचे आदेश दिले आहेत. या बंदीमुळे तेल पुरवठ्यात तुटवडा निर्माण होऊ शकतो, ज्याचा परिणाम थेट किंमतींवर होईल. भारतासारख्या आयातदार देशांसाठी हा मोठा धोका आहे, कारण भारताचा मोठा भाग कच्च्या तेलाचा पुरवठा याच मार्गातून होतो. भारतावर काय परिणाम होणार? भारत हा जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेल आयातदार देशांपैकी एक आहे, आणि त्याचा मोठा भाग मध्य पूर्वातून येतो. होर्मुज खाडी बंद झाल्यास पुरवठा साखळी प्रभावित होईल, ज्यामुळे इंधन दर वाढतील. सरकारकडून पर्यायी मार्ग, साठा वाढवणे किंवा इतर देशांकडून आयात वाढवण्याचे प्रयत्न होऊ शकतात, पण दीर्घकाळ युद्ध चालल्यास आव्हान मोठे असेल. या संकटाचा सामना करण्यासाठी भारताची रणनीती आता महत्त्वाची ठरणार आहे.