India’s growth rate: मूल्यांकनाच्या नव्या पद्धतीनुसार तिसर्या तिमाहित म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारताचा विकासदर वाढून 7.8% इतका भरला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत भारताचा विकास दर 7.4% होता. मूल्यांकनासाठीचे वर्ष बदलून आता 2022-23 करण्यात आले आहे. यामुळे सध्याची आकडेवारी अधिक अचूक समजली जाते. या अगोदर मूल्यांकनासाठीचे किमतीचे संदर्भ वर्ष 2011-12 होते. नव्या मूल्यांकनानुसार जुलै ते सप्टेंबर या दुसर्या तिमाहीतील विकासदर 8.4% इतका भरला आहे. तर पहिल्या तिमाहित विकासदर 6.7% इतका भरला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार तिसर्या तिमाहीत मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढल्यामुळे एकूण विकासदराची आकडेवारी सकारात्मक होण्यास मदत झाली. 2023-24 मधील विकास दर 7.2% तर 2024- 25 मधील विकासदर 7.1% होता. म्हणजे गेल्या तीन वर्षापासून भारताचा विकासदर 7% पेक्षा जास्त आहे. हा विकास तर जगातील कोणत्याही विकसित किंवा विकसनशील देशापेक्षा जास्त असल्याचे सरकारी अधिकार्यांनी सांगितले. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढत असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. 2023-24 आणि 2025-26 या आर्थिक वर्षामध्य मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता दहा टक्क्यापेक्षा जास्त असल्याचे सांख्यिकी विभागाने म्हटले आहे. व्यापार, दुरुस्ती, हॉटेल ,वाहतूक, दूरसंचार, सेवा, प्रसारण इत्यादी क्षेत्राचा विकासदर 2025-26 मध्ये 10.1% पेक्षा जास्त झाला आहे. ग्राहक उपयोगी वस्तूवरील खर्च सात टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर भांडवली खर्चही 7 टक्क्यांनी वाढला असल्याचे सांगण्यात आले. संदर्भ वर्ष बदलण्याबरोबरच विविध क्षेत्रातून जास्त आकडेवारी उपलब्ध करण्यात आली. त्यामध्ये जीएसटी, सेवा, ई -वाहन इत्यादी क्षेत्रातील अनेक उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. चालू वर्षाचा विकास दर जास्त राहणार – नव्या मूल्यांकनामुळे 2026-27 या आर्थिक वर्षाचा विकासदर अंदाज आता वाढून 7 ते 7.4 टक्के इतका करण्यात आला आहे. या अगोदर संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये हा अंदाज 6.8 ते 7.2% इतका ठेवण्यात आला होता. त्यामध्ये 0.2% वाढ करण्यात आली आहे. नव्या आकडेवारीनुसार आता विकासदराचे मूल्यांकन करण्यात येत असल्याचे सांख्यिकी विभागाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले. नवी आकडेवारी अधिक सकारात्मक- नागेश्वरन भारताने संदर्भवर्ष योग्यवेळी न बदलल्यामुळे भारताची राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी विश्वासारखं वाटत नाही असे, टीका काही पतमुल्यांकन संस्थांनी केली होती. आता बदललेल्या संदर्भ वर्षानुसार भारताचा विकासदर जास्तच भरला आहे. यामुळे पतमानांंकन संस्थांचे समाधान होईल अशी अपेक्षा अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केली. जुन्या संदर्भ वर्षानुसार आणि नव्या संदर्भ वर्षानुसार भारताचा विकासदर कितीतरी जास्त आहे. त्यामुळे आता या संस्थांना भारताच्या आकडेवारीबद्दल शंका घेण्याची गरज पडणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. मॅन्युफॅक्चरिंग व सेवा क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून सकारात्मक बदल झाले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी अधिक आशादायक झाले आहे. कृषी क्षेत्र आणि इतर क्षेत्रातील उत्पादकता पुरेशा वेगाने वाढलेली नाही. ही उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा सुरू केल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील उत्पादकता आगामी काळात वाढेल आणि त्याचे प्रतिबिंब राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारी दिसून येईल असे त्यांनी नमूद केले.