धनतेरसला भारतीयांची तब्बल एक लाख कोटींची खरेदी; सोन्या-चांदीच्या दरवाढीनंतरही ग्राहकांचा उत्साह कायम

नवी दिल्ली – जीएसटी दर कपातीमुळे विविध वस्तूंचे दर कमी झाले आहेत. सोने आणि चांदीच्या खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. अशा परिस्थितीत देशभरात भारतीयांनी धनतेरसला एक लाख कोटी रुपयाची खरेदी केली आहे. ग्राहकांनी दागिन्याचीही खरेदी केली असल्याचे कॉन्फरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने नमूद केले.
सोने आणि चांदीचे दर जास्त प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीची खरेदी कमी होईल असे समजले जात होते. मात्र या संघटनेने असा दावा केला की, धनतेरसला सोने आणि चांदीची खरेदी 60हजार कोटी रुपयांची झाली. गेल्या वर्षी झालेल्या खरेदी पेक्षा ही खरेदी 25 टक्क्यांनी जास्त असल्याचे सांगण्यात आले. या वर्षात सोन्याचा दर 60% नी वाढून 1 लाख 30 हजार रुपयांवर गेला आहे. मात्र ग्राहकाच्या उत्साहात घट झालेली नाही.
या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा म्हणाले की, गेल्या दोन दिवसापासून देशातील दागिन्याच्या दालनातील गर्दी कमी झालेली नाही. दिल्लीत 10 हजार कोटी रुपयांचे दागिने किंवा सोने आणि चांदी खरेदी केली गेली. चांदीचा दर गेल्या वर्षाच्या 98 हजार रुपयांवरून 1 लाख 80 हजार रुपये झाला आहे. मात्र तरीही चांदीची खरेदी कमी झालेली नाही.
दागिन्याशिवाय ग्राहकांनी 15 हजार कोटी रुपयांची गृहोपयोगी उपकरणे खरेदी केली, 10 हजार कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या. तर 3 हजार कोटी रुपयाचे रोशनाईचे सामान खरेदी केले. या खरेदीमध्ये ग्राहक स्वदेशी वस्तूची जास्त खरेदी करीत असल्याचे मत या संघटनेचे महासंचालक प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केले.
सकाळपासून गर्दी –
“सकाळपासून दवसभर खरेदीदारांची सततची गर्दी दिसत आहे. बुलियन, सोने, हिरे तसेच चांदीचे दागिने आणि चांदीची भांडी या सर्व श्रेणींमध्ये मजबूत मागणी होती. बुलियनमध्ये म्हणजे सोने व चांदीची नाणी आणि बिस्किटे यांची विक्री वाढली. लग्नसमारंभासाठीच्या दागिन्यांच्या प्री-बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल रात्री सोन्याच्या किंमतीत झालेल्या किंचित घसरणीमुळे सणासुदीची खरेदीला पुन्हा जोम आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 15-20 टक्के वाढ आम्हाला अपेक्षित आहे.”
– डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पी.एन.जी. ज्वेलर्स





