Women ODI Cricket India : ODI मध्ये पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करून दाखवलं; ‘तो’ विक्रम केला नावावर

भारतीय महिला क्रिकेट संघाने राजकोटमध्ये झालेल्या आयर्लंडविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठा विक्रम केला आहे. ODI मध्ये पुरुषांना जमली नाही अशी कामगिरी महिला क्रिकेटर्सनी केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली आहे. ज्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघाचा समावेश आहे.
पुरुष किंवा महिला संघाने क्रिकेटमध्ये 2011 मध्ये सर्वोधिक धावसंख्या नोंदवली होती. तेव्हा भारताने संघाने 418/5 धावा केल्या होत्या. तर महिला संघाने आयर्लंडविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करत 435 धावांचा डोंगर उभा केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये महिला संघाचा एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या नावे आहे. हा रेकॉर्ड त्यांनी 2018 मध्ये आयर्लंडविरोधातच केला होता. न्यूझीलंडच्या नावावर 491 धावा आहेत.
पहिल्यांदाच महिला संघाने पार केला 400 चा टप्पा
भारतीय संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला क्रिकेट संघाने यावेळी आपली सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली तसंच पहिल्यांदा 400 चा आकडाही पार केला. याआधी 12 जानेवारीला महिला संघाने 370 धावा करत सर्वाधिक धावांची नोंद केली होती.
टीम इंडियाची कामगिरी
राजकोट येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात स्मृतीने आयर्लंडविरुद्ध अवघ्या 70 चेंडूत शतक झळकावलं, तिने 80 चेंडूत 135 धावा केल्या. यामध्ये 7 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश आहे. स्मृती व्यतिरिक्त, सलामीवीर प्रतिका रावलनेही 129 चेंडूत 154 धावांची शानदार खेळी केली. प्रतिकाचे हे पहिले एकदिवसीय शतक आहे. प्रतीका रावलने आतापर्यंत सहा एकदिवसीय डावांमध्ये 74 च्या सरासरीने 444 धावा केल्या आहेत.
या सामन्यात प्रतिका आणि कर्णधार मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 26.4 षटकांत 233 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिचा घोषनेही 59 धावांची शानदार खेळी केली. यानंतर भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत आयर्लंडच्या संघाला १३१ धावांवर ऑल आउट केले. आणि भारतीय संघाने 304 धावांनी हा सामना जिंकला.





