कॅनडातील भारतीय विद्यार्थी उतरले रस्त्यावर; ‘या’ कारणामुळे जस्टीन ट्रुडो सरकारविरोधात जोरदार निदर्शने

टोरांटो – कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांनी तेथील जस्टीन ट्रुडो यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. ट्रुडो यांच्या सरकारने जी नवीन धोरणे आखली आहेत त्यानुसार आपल्याला कॅनडातून बाहेर जावे लागेल अशी भीती या विद्यार्थ्यांना सतावत असून त्याच्या निषेधार्थ त्यांनी रस्त्यावर उतरून कॅनडा सरकारचा निषेध केला.
कॅनडा सरकारच्या नव्या धोरणामुळे परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या व विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. या धोरणामुळे ७० हजारपेक्षा जास्त पदवी विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार कॅनडाच्या प्रिन्स एडवर्ड आयलंड प्रांतात भारतीय विद्यार्थ्यांनी गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळाहून विधानसभेसमोर ठिय्या दिला आहे आणि धोरणात अचानक करण्यात आलेल्या बदलाचा निषेध करत आहेत. याच प्रकारे ओंटारियो, मैनिटोबा आणि ब्रिटिश कोलंबिया आदी प्रांतांमध्येही निदर्शने सुरू आहेत.
काय आहे कॅनडाचा निर्णय?
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार स्थायी निवास नामांकनाच्या संख्येत २५ टक्के कपात करण्याचा कॅनडा सरकारचा उद्देश आहे. याचसोबत शिक्षणासाठी येण्याबाबतचे परमिटही मर्यादीत करणे हा आहे. गेल्या काही काळात कॅनडाच्या लोकसंख्येत वाढ झाल्याची चर्चा आहे. त्याच सुमारास सरकारने हे बदल केले आहेत. गेल्या वर्षभरात कॅनडाच्या लोकसंख्येत जी वाढ झाली त्यातील जवळपास ९७ टक्के वाढ ही बाहेरून आलेल्या लोकांमुळे झाली आहे. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले की या वर्षाच्या अखेरीस जेंव्हा त्यांच्या वर्क परमिटची मुदत संपेल तेंव्हा त्यांना देश सोडावा लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.





