India-Pakistan : पंतप्रधान मोदींकडून सुरक्षा परिस्थितीचा आढावा; भविष्यातील कारवाईची रणनीती आखली

India-Pakistan – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संरक्षण दलाच्या उच्च पदस्थांसोबत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीचे अध्यक्षपद पंतप्रधानांनी भूषविले.
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढत असताना, मोदींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सशस्त्र दलांचे प्रमुख आणि संरक्षणदल प्रमुख यांची भेट घेऊन भविष्यातील कारवाईची रणनीती आखली.
पाकने ८ आणि ९ मे रोजी मध्यरात्री भारतातील काही ठिकानांना लक्ष्य प्रयत्न केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संघर्ष अजून तीव्र झाला आहे.
दरम्यान, पाकिस्तानने लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले, असे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, पाकिस्तानने लेह ते सर क्रीक अशा ३६ ठिकाणी भारतीय लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी ३००-४०० ड्रोन पाठवले होते.
ते ड्रोन भारतीय लष्कराने पाडले असल्याचे त्या म्हणाल्या. तत्पुर्वी, पंतप्रधान मोदींनी तिन्ही दलांच्या माजी प्रमुखांसह माजी सैनिकांशी संवाद साधताना सद्य परिस्थितीबद्दल त्यांचा अभिप्राय घेतला.
तणावामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित :
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू, कठुआ, सांबा, उधमपूर, राजौरी आणि पूंछ यासारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. सांबा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोन दिसले, जे भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ताबडतोब निष्क्रिय केले.
सुरक्षेच्या कारणास्तव होशियारपूर जिल्ह्यात पूर्णपणे ब्लॅकआउट करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या उपायुक्त आशिका जैन यांनी हवाई दलाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा आदेश जारी केला आणि लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.
श्रीनगर विमानतळ १४ मे पर्यंत बंद :
पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे आणि सीमेवरील तणावामुळे श्रीनगर विमानतळ १४ मे पर्यंत बंद करण्यात आले आहे. यासोबतच जम्मू आणि बारामुल्लासारख्या प्रमुख भागातही ब्लॅकआउट लागू करण्यात आले आहे.
‘घराबाहेर पडू नका…’; ओमर अब्दुल्ला यांचे आवाहन
उमर अब्दुल्ला म्हणाले, “जम्मू आणि आसपासच्या सर्व लोकांना माझे नम्र आवाहन आहे, की कृपया रस्त्यांपासून दूर रहा, घरी किंवा जवळच्या ठिकाणी रहा जिथे तुम्हाला पुढील काही तास आरामात राहता येईल.
अफवांवर लक्ष देऊ नका, निराधार किंवा असत्यापित कथा पसरवू नका आणि आपण एकत्रितपणे यावर उपाय करू.” असं ते म्हणाले.





