India-Pakistan : भारत-पाक तणावाच्या छायेत मुंबई; उद्यापासून शहरात फटाके फोडण्यास आणि रॉकेट उडवण्यावर बंदी

India-Pakistan । mumbai : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती कायम आहे. काल (दि. ९) पुन्हा एकदा पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील उरी, तंगधार, केरन, मेंढर, नौगाम आणि पूंछ या सहा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केला. त्याच वेळी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला.
तर दुसरीकडे, चंदीगड आणि अंबाला येथे हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमधील फिरोजपूर आणि राजस्थानमधील जैसलमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्यांचे ४ ड्रोन पाडल्याचे समोर आलं.
शुक्रवारी संध्याकाळी जम्मू शहरात अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले, त्यानंतर हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. सीमेपलीकडून पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामुळे हे स्फोट झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली.
दरम्यान, सीमेवर वाढता तणाव आणि भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत उद्यापासून फटाके फोडण्यास आणि रॉकेट उडवण्यास सक्त बंदी आहे.
दि. ११ मे ते ९ जूनपर्यंत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आदेशाचं पालन न केल्यास कडक कारवाई करणार असल्याचंही म्हटलं आहे. सध्या देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, सामान्य नागरिक देखील भीतीच्या सावटाखाली असल्याचं दिसत आहे.
होशियारपूरमध्ये ड्रोनचे अवशेष :
होशियारपूरमधील टांडाजवळील एका गावात, सीकरी येथे ड्रोन दुर्घटनाग्रस्त झाले. स्थानिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं समोर :
दि. ७ मे रोजी भारतीय लष्कराच्या एअर स्ट्राईकमध्ये मोठे दहशतवादी ठार… युसूफ अझहर, मुदस्सर खान, हाफीज जमील ठार… ७ मेच्या भारतीय हल्ल्यात टॉप – ५ दहशतवादी ठार





