India – China : भारत आणि चीन (India – China) दोन्ही देशांनी एकमेकांकडे भागीदार म्हणून बघितले पाहिजे, एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून बघायला नको, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी म्हटले आहे. चीनच्या नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या वार्षिक पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय एकमेकांबरोबरचे संबंध सुधारण्याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या दोघांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेवर भारत आणि चीनने ठाम रहायला पाहिजे, असेही वँग यी म्हणाले. मोदी आणि जिनपिंग यांच्यात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तियान्जिनमध्ये चर्चा झाली होती. २०२४ मध्ये कझान येथे झालेल्या बैठकीच्या आधारे दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना नवीन सुरुवात करून देण्याचे मान्य केले होते. तियान्जिन शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा झाली होती, असेही ते म्हणाले. दोन्ही देशांमध्ये सर्व पातळ्यांमध्ये नवीन उर्जेने संवाद होतो आहे. द्विपक्षीय व्यापाराचे विक्रम होत आहेत. लोकांमधील थेट संपर्क प्रस्थापित होत आहेत. दोन्ही देशांच्या जनतेसाठी हे संबंध फायद्याचे आहेत. हे पाहून आम्हाला समाधान वाटते आहे. दोन्ही देशांनी एकमेकांबद्दलचे भागीदार म्हणून योग्य धोरणात्मक दृष्टिकोन ठेवावेत. स्पर्धक म्हणून बघू नये. एकमेकांकडे धोका म्हणून बघण्यापेक्षा संधी म्हणून पहावे, असेही वँग यी म्हणाले. ब्रिक्स परिषदेचे आयोजन या वर्षी भारतात, तर पुढील वर्षी चीनमध्ये होणार आहे. त्यामुळे ब्रिक्सच्या आयोजनात दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करावे. अशी अपेक्षाही त्यांनी केली. परस्पर पूरक भूमिका आशियाच्या हितासाठी आवश्यक… दोन्ही देशांनी चांगले शेजारी आणि मित्र रहावे आणि सीमाभागात संयुक्तपणे शांतता आणि स्थैर्याचे रक्षण करावे. विकासावर लक्ष केंद्रित करावे. एकमेकांचे महत्वाचे शेजारी आणि ग्लोबल साऊथमधील सदस्य म्हणून भारत आणि चीनमध्ये पुरातन सांस्कृतिक संबंधांचा वारसा आहे. दोघांमध्ये व्यापक समान हितसंबंध देखील आहेत. परस्पर विश्वास आणि सहकार्य दोन्ही देशांच्या विकासाच्या फायद्याचे आहे. मतभिन्नता आणि संघर्ष आशिया खंडाच्या पुनरुज्जीवनासाठी हानिकारक आहेत, असेहीवँग यी म्हणाले.