India Beat Pakistan : हॉकीच्या मैदानात पाकिस्तानी संघाचे वस्त्रहरण! भारतीय मुलींनी तब्बल १९ गोल डागत उपांत्य फेरीत मारली धडक
India Beat Pakistan : भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने पाकिस्तानचा १९-० असा एकतर्फी पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

India beat Pakistan 19-0 Junior Women Asia Cup 2026 Enter Semifinal : चीनमध्ये सुरू असलेल्या महिला कनिष्ठ आशिया चषक हॉकी २०२६ (Junior Women Asia Cup 2026) स्पर्धेत भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने पाकिस्तानचा १९-० असा एकतर्फी पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताच्या आक्रमक खेळासमोर पाकिस्तानी संघ अक्षरशः निष्प्रभ ठरला. या महाविजयात भारताच्या तब्बल १३ खेळाडूंनी गोल डागले, ज्यात पूजा मलिकने सर्वाधिक ३ गोल केले.
पूजा साहूने उघडले खाते; पहिल्या हाफमध्येच १० गोलांचा पाऊस –
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी मैदानावर पूर्ण ताबा मिळवला. खेळाच्या सातव्या मिनिटाला पूजा साहूने मैदानी गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानंतर भारतीय मुलींनी गोलची झडीच लावली. पहिल्या हाफपर्यंत भारताने १०-० अशी अभेद्य आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतरच्या दोन क्वार्टरमध्ये भारताने आणखी ९ गोल डागून पाकिस्तानची पूर्ण दाणादाण उडवली. पूजा मलिकच्या ३ गोल्सव्यतिरिक्त रोशनी, सानिका, मधू आणि सुप्रिया यांनी प्रत्येकी २-२ गोल नोंदवले. संपूर्ण सामन्यात पाकिस्तानला एकही गोल करता आला नाही.
जेतेपदाच्या हॅटट्रिकवर भारताची नजर; साखळी फेरीतही अपराजित मोहीम –
🎥 PROOF FOR THE PEOPLE OF PAKISTAN!
Thankfully match was broadcasted live, or our neighbours would have claimed victory here!
🇮🇳 INDIA 19-0 PAKISTAN 🇵🇰 https://t.co/9JUlq8DHrq pic.twitter.com/9NllolXsmD
— The Khel India (@TheKhelIndia) September 10, 2026
डिफेंडिंग चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाचे लक्ष आता सलग तिसऱ्यांदा आशिया चषकावर नाव कोरण्यावर आहे. भारताने यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्येही हा बहुमान पटकावला होता. यंदाच्या स्पर्धेतही भारतीय संघाचा अजेय विजयरथ कायम असून साखळी फेरीत जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरिया या बलाढ्य संघांना भारताने पराभवाची धूळ चारली होती.
१२ सप्टेंबरला उपांत्य फेरीचा थरार; दक्षिण कोरिया किंवा मलेशियाशी गाठ –
उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा ऐतिहासिक फडशा पाडल्यानंतर आता भारतीय महिला संघाचा उपांत्य सामना १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. दक्षिण कोरिया आणि मलेशिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्या संघाशी भारताची गाठ पडेल. सध्याचा भारताचा फॉर्म पाहता भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.





