इंदापूर तालुका कोरडा ठाक

खडकवासला डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी
कळस – ऐन पावसाळ्यात इंदापूर तालुक्याच्या अनेक गावांना दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला आहे. तर माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तर परिसरातील जीवनदायिनी असलेल्य खडकवासला डावा कालव्याला शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन
सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. मागील दोन वर्षांपासून ओढा किंवा चारीला पाणी सोडले नसल्याने जनावरांना व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कालव्यावर अवलंबून असलेल्या विहिरी कोरडा पडल्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. वायाळवस्ती, गोसाविवाडी, विठ्ठलवाडी, तसेच अनेक वाड्यावस्तीवरील पिण्याच्या पाण्यासह शेती या कालव्यावर अवलंबुन आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. पूर्वी वर्षातून ठराविक कालावधीनंतर मिळाणारे अवर्तन अलीकडे बेभरवशाचे झाले आहे. बहुतांश गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी खाली गेली असून अनेक ठिकाणच्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बंधारे, नाले, तलाव कोरडे पडले आहेत त्यामूळे पाण्याची समस्या अधिकच बिकट झाली आहे. पाण्याचे साठे संपुष्टात आले आहेत.
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा
गेल्या तीन-चार वर्षांपासून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळाने व्याकूळ झालेल्या शेतकरी आता पाण्यासाठी विहीर उपसा करून भूगर्भाची खोली धुंडाळताना दिसत आहे. पोकलेनच्या सहाय्याने तासाला 2000 ते 2500 भाडे देऊन विहिरीचे खोदकाम शेतकरी करीत आहे. तसेच बोअरवेल घेऊन कूपनलिका किंवा विहिरीत आडवे बोअर घेऊन पाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे; मात्र त्यासही पाणी लागत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.





