इंदापूर : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात 50 हजार वारकऱ्यांची चरण सेवा केल्याबद्दल इंदापूरच्या जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक जयवंत नायकुडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (5 जुलै) सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार वारकऱ्यांच्या चरण सेवेसाठी जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती. त्यानुसार, महाविद्यालयातील सुमारे 350 विद्यार्थ्यांनी इंदापूर तालुक्यातील सणसर ते पंढरपूर या पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या पालखी तळावर तेलाने मसाज करून 50 हजार वारकऱ्यांची चरण सेवा केली. निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, सहाय्यता निधी कक्ष प्रमुख स्वानंद सोनार, पुणे जिल्हा प्रमुख डॉ. मानसिंग साबळे आणि सोलापूर जिल्हा प्रमुख डॉ. अविनाश खांडेकर यांनी भेट देऊन चरण सेवेत सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थिनी सानिका फुलारी, तेजस्विनी आठवले आणि प्रथमेश डोंबाळे म्हणाले, “विठुरायाच्या भक्तांची सेवा करण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आमच्या छोट्याशा कार्याची शासनाने दखल घेतली, याबद्दल समाधान वाटते.” या चरण सेवेचे संपूर्ण नियोजन ऋषिकेश नायकुडे यांनी केले. जयवंत नायकुडे म्हणाले, “गेल्या 20 वर्षांपासून आम्ही वारकऱ्यांची चरण सेवा करत आहोत. यंदा मुख्यमंत्री कार्यालयाच्या विनंतीनुसार आम्ही पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरपर्यंत सेवा केली. माऊलींची चरण सेवा करताना आम्हाला प्रत्यक्ष विठुरायाच्या दर्शनाचा अनुभव आला.”