Indapur News – इंदापूर पंचायत समितीच्या वतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत’ नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा शनिवारी (दि. १४) लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना विकासाचा मंत्र दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना भरणे भावूक झाले, ते म्हणाले की, तालुक्यातील सर्व सदस्यांना निवडून देण्यात अजितदादांची प्रेरणा आणि जनतेचा विश्वास आहे. मात्र, आज ते आपल्यात नाहीत, ही मोठी पोकळी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत विकासकामांतूनच त्यांना खरी श्रद्धांजली द्यावी. आता निवडणूक संपली आहे, त्यामुळे गट-तट आणि आपला-परका हा भेद विसरून सर्वांना विश्वासात घेऊन काम करा. माजी हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले की, ७२ टक्के मतदान झाले आणि १ लाख ५२ हजारांहून अधिक मते मिळाली, हा जनतेचा विकासावर असलेला ठाम विश्वास आहे. नवनिर्वाचित सदस्यांनी ‘यशदा’ प्रशिक्षणाद्वारे आपल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवावे आणि नियमित बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवावा. जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी संघटित नियोजन व एकजुटीमुळे मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी विकासकामे राबविण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, दीपक जाधव, तुषार जाधव, सागरबाबा मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने श्रीमंत ढोले यांनी मतदारांचे आभार मानत सर्व योजना तळागाळात पोहोचवण्याची ग्वाही दिली. पंचायत समिती सदस्य बापू शेंडे यांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर, महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येण्याचे आवाहन, जिल्हा परिषद सदस्या निर्मला मिसाळ यांनी केले. “लोकप्रतिनिधी म्हणून एकही सभा किंवा बैठक चुकवू नका. सभागृहात उपस्थित राहिल्यामुळेच नवनवीन योजनांची माहिती मिळते आणि कामाची दिशा स्पष्ट होते. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील गोरगरिबांपर्यंत पोहोचवणे, ही सदस्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.” – दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री