इंदापूर : गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असून, भक्ती आणि उत्साहासोबतच एकतेचा संदेश देणारा सण आहे. यंदा इंदापूरमध्ये हा संदेश प्रत्यक्षात उतरला. रविवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी आयोजित गणरायाच्या महाआरतीत हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सहभाग घेतला आणि सामाजिक सलोख्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाआरतीच्या वेळी “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. या सोहळ्यात मंत्र्यांचे कुटुंबीय, गावातील नागरिक, कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर मुस्लिम समाजातील मान्यवरांनी शांतता, बंधुता आणि भाईचारा कायम राहण्यासाठी दुआ केल्या. याप्रसंगी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “गणपती बाप्पा हे महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील दैवत आहे. आज हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन महाआरतीत सहभाग घेतला, हा ऐक्याचा संदेश समाजाला प्रेरणा देणारा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती कायम ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.” स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. एका नागरिकाने मत व्यक्त करताना सांगितले, “धर्म वेगळे असले तरी आपल्या भावना आणि सुख-दुःख एकच आहे. गणरायाच्या महाआरतीतून मिळालेला हा सलोख्याचा संदेश गावागावात पोहोचायला हवा.” या भक्तीमय आणि ऐक्याच्या भावनेने नटलेल्या वातावरणाने उपस्थितांची मने जिंकली. इंदापूरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा संदेश केवळ तालुक्यापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात झालेली ही महाआरती सामाजिक एकतेचा आदर्श घालून गेली आहे.