IND vs PAK : आधी २७ वर शून्य बाद, मग ५५ वर ऑल आऊट! टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी पाकिस्तानला पाजलं पाणी
IND vs PAK : भारतीय महिला संघाच्या फिरकीपटूंनी पाकिस्तानचा अवघ्या ५५ धावांवर खुर्दा पाडला.

Womens Asia Cup 2026 IND vs PAK Pakistan All Out For 55 Lowest Total Sri Charani Prema Rawat : महिला आशिया चषक २०२६ (Women’s Asia Cup 2026) स्पर्धेत भारतीय महिला संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची पुरती दैना उडवली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी ५ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या ग्रुप-ए च्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी पाकिस्तानचा अवघ्या ५५ धावांवर खुर्दा पाडला. या लाजिरवाण्या कामगिरीसह पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय महिला टी-२० मधील आपल्या आजवरच्या सर्वात नीचांकी धावसंख्येची (Lowest Total) नोंद केली. यापूर्वी त्यांचा निचांक ५६ धावांचा होता.
२७ धावांवर पहिली विकेट अन् पत्त्यांसारखा कोसळला डाव –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला मुनिबा अली आणि शवाल जुल्फिकार यांनी ४.२ षटकांत २७ धावांची बऱ्यापैकी सुरुवात करून दिली होती. या दरम्यान भारतीय क्षेत्ररक्षक प्रतिका रावलने दोन सोपे झेल सोडल्याने मुनिबा अलीला दोनदा जीवदानही मिळाले. मात्र, पाचव्या षटकात शफाली वर्माने पहिली विकेट मिळवून दिली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजीला अशी गळती लागली की एकाही फलंदाजाला मैदानावर साधे उभेही राहता आले नाही.
श्री चरणी, प्रेमा आणि दीप्तीची फिरकी जादू; पाडला विकेट्सचा पाऊस!
Innings Break!
An outstanding bowling performance from #TeamIndia! 🙌 🙌
3️⃣ wickets each for Sree Charani & Prema Rawat
2️⃣ wickets for Deepti Sharma
1️⃣ wicket for Shafali VermaStay tuned for India’s chase! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/1WHHWPMe2o#WomensAsiaCup pic.twitter.com/e27WuNsSL0
— BCCI Women (@BCCIWomen) September 5, 2026
पाकिस्तानचा डाव उद्ध्वस्त करण्यात भारताच्या स्पिन त्रिकुटाने मोलाची भूमिका बजावली. युवा फिरकीपटू श्री चरणीने अवघ्या ५ धावांत ३ प्रमुख फलंदाजांना बाद केले. तिने ४ षटकांत केवळ ७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रेमा रावतने ४ षटकांत ९ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स घेतल्या, तर अनुभवी दीप्ती शर्माने कर्णधार फातिमा सनासह २ फलंदाजांना तंबूत धाडले. भारताने सलग तिसऱ्या सामन्यात विरोधी संघाला ७० पेक्षा कमी धावांत गुंडाळण्याचा पराक्रम केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४७ वेळा १०० पेक्षा कमी धावा; पाकिस्तानची नामुष्की –
५५ धावांवर सर्वबाद होऊन पाकिस्तानच्या नावावर अत्यंत लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानी महिला संघ आतापर्यंत तब्बल ४७ वेळा १०० पेक्षा कमी धावसंख्येत गारद झाला आहे. या ४७ सामन्यांपैकी पाकिस्तानला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला होता. भारतीय गोलंदाजांच्या या अचूक आणि भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली.





