ICC चॅम्पियन्स ट्रॉफीला येत्या काही दिवसांत सुरुवात होणार आहे. सर्व क्रीडा प्रेमींना प्रतिक्षा आहे ती महामुकाबल्याची. भारत-पाकिस्तानच नाही, तर जगभरातील क्रिकेट फॅन्स या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. दुबईत 23 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान यांच्यात हा सामना पार पडणार आहे. या महामुकाबल्याला आता फक्त पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. या सामन्याच्या अगोदर पाकिस्तानचा उपकर्णधार सलमान अली आगा याने एक मोठे विधान केले आहे. काय म्हणाला सलमान अली आगा ? सलमान अली आगा पीसीबीच्या पॉडकास्टमध्ये विचारण्यात आलं की, “चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला हरवणं की, टुर्नामेंट जिंकणं काय महत्त्वाच आहे?” त्यावर पाकिस्तानचा उपकर्णधार म्हणाला की, “भारत-पाकिस्तान मोठा सामना असतो. जर, आम्ही भारताला हरवलं पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकलो नाही, तर याला काही अर्थ नाही” “जर, आम्ही भारताकडून हरलो पण चॅम्पियन्स ट्रॉफी उचलता आली, तर ही एक मोठी बाब असेल” असे सलमान अली आगा म्हणाला. चॅम्पियन्स ट्रॉफीत कितव्यांदा आमने-सामने? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दोन्ही टीम्समध्ये सहाव्यांदा सामना होईल. आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तानच्या टीम्स पाचवेळा आमने-सामने आल्या आहेत. यात पाकिस्तानने तीन आणि भारताने दोनवेळा विजय मिळवला आहे. पाकिस्तानने २०१७ मध्ये भारताला फायनलमध्ये हरवून ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.