IND vs AFG 1st T20I : भारत-अफगाणिस्तान पहिल्या मॅचच्या तारखेत बदल? पोलिसांच्या सूचनेनंतर डीडीसीएने घेतला अंतिम निर्णय
IND vs AFG 1st T20I : दिल्ली पोलिसांनी सुरक्षा आणि वाहतुकीच्या कारणास्तव दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (DDCA) या सामन्याची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

IND vs AFG 1st T20I Match Delhi Arun Jaitley Stadium Schedule Controversy DDCA Police : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात १३ सप्टेंबर रोजी रंगणाऱ्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यावर अचानक अनिश्चिततेचे ढग दाटून आले होते. दिल्ली पोलिसांनी सुरक्षा आणि वाहतुकीच्या कारणास्तव दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (DDCA) या सामन्याची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. अवघ्या दोन दिवसांवर हा सामना येऊन ठेपलेला असताना पोलिसांच्या या मागणीमुळे क्रिकेट वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, डीडीसीएने अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत हा सामना नियोजित दिवशीच खेळवला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
ब्रिक्स परिषदेमुळे सुरक्षेचा मोठा पेच; दिल्ली पोलिसांची विनंती!
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजधानी दिल्लीमध्ये ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान ब्रिक्स (BRICS) शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेनिमित्त अनेक देशांचे प्रमुख, विदेशी राजनैतिक अधिकारी आणि व्हीव्हीआयपी पाहुणे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत १३ सप्टेंबरला अरुण जेटली स्टेडियमवर सामना झाल्यास रस्त्यांवरील वाहतुकीवर प्रचंड ताण येईल; त्यामुळे सामन्याचे वेळापत्रक बदलावे, अशी सूचना पोलिसांनी केली होती.
डीडीसीए आणि पोलिसांमध्ये तातडीची बैठक; तोडगा काढण्यात यश!
India–Afghanistan 1st T20I on 13 September at Arun Jaitley Stadium will go ahead as scheduled.
Following a meeting with Delhi Traffic Police, DDCA has been assured of all necessary support and arrangements.
No postponement.🏏🇮🇳🇦🇫
— DDCA (@delhi_cricket) September 10, 2026
पोलिसांच्या विनंतीनंतर डीडीसीए आणि दिल्ली ट्रॅफिक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तातडीची बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर डीडीसीएने अधिकृत निवेदन जारी केले. क्रिकेट संघटनेने पोलिसांना संपूर्ण सहकार्य आणि सुरक्षेच्या सर्व अतिरिक्त व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीनंतर वाद मिटला असून, कोणताही बदल न करता सामना १३ सप्टेंबर रोजीच अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अफगाणिस्तान ‘यजमान’; मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीतच –
या टी-२० मालिकेत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यजमान म्हणून जबाबदारी सांभाळत आहे; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही संपूर्ण मालिका भारतात खेळवली जात आहे. १३ सप्टेंबर रोजी पहिला सामना झाल्यानंतर १५ आणि १७ सप्टेंबर रोजी उर्वरित दोन सामने पार पडतील. सामन्याच्या वेळापत्रकाबाबत निर्माण झालेला गोंधळ दूर झाल्यामुळे आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला असून, मैदानावर हायव्होल्टेज लढतीचा थरार पाहायला मिळणार आहे.





