देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीपात्रात गत 15 दिवसांपासून मासे मरण्याचे प्रमाण थांबेना. प्रति दिन हजारो मृत माशांचा खच नदीकिनारी पडत असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
वारकरी सांप्रदायमध्ये इंद्रायणी नदी पवित्र मानली जाते. मात्र उगमस्थान म्हणजे लोणावळापासून नदी प्रदुषित होण्यास सुरवात होते. लोणावळ्यातील वस्त्यांमधील सांडपाणी नदीपात्रात मिसळले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आहे. त्यानंतर प्रत्येक गावातील सांडपाणी, कंपन्यांमधील रासायनिक पाणी थेट नदीत मिसळत आहे. इतर वनस्पतींपेक्षा जलपर्णी वाढीचा वेग तिप्पट असतो. इंद्रायणी नदी मिळणाऱ्या सांडपाण्यामुळे जलपर्णी वेगाने वाढत असून काही ठिकाणी तिने नदीला पूर्णपणे व्यापले आहे. जलपर्णी वाढल्यामुळे तसेच रसायनिक पाण्यामुळे नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मासे व नदीतील इतर जलचर ऑक्सिजन मिळविण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्यातच पाण्याचा वाढता वापर आणि उन्हाळ्यातील उष्माची वाढती तीव्रता यामुळे नदीपात्रातील पाण्याचे बाष्पिभवन होत असून त्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. जलपर्णीमुळे सूर्यकिरणे पाण्यात कमी पोहोचणे व पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे यामुळे माशांचा मृत्यू होत असल्याचे स्वीकृत दर्शनी दिसून येत असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी सांगितले.
इंद्रायणी नदी घाट परिसरामध्ये नागरिकांची वर्दळ असते. मात्र मृत माशांचे गत पंधरा दिवसांपासून होणाऱ्या मृत्यूमुळे दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांची वर्दळ ही थांबली आहे. नदीपात्राच्या वर येणारे मृत झालेल्या माशांना कावळे उचलून इतरत्र टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गजराज बोटिंग क्लबच्या कर्मचाऱ्यांकडून तसेच सेवाभावी नागरिकांकडून नदीपात्रातील मृत मासे नदी पात्रातून काढण्यात येत आहेत.
दुर्गंधी पसरू नये, तसेच रोगराई निर्माण होऊ नये, यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पालखी सोहळा दहा दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष केंद्रित करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
देहू नगरपंचायतीच्या वतीने इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढण्यात आली आहे. उर्वरित जलपर्णी काढण्याचे कामही सुरू आहे. सांडपाणी व दूषित पाणी मिळणारे स्तोत्र बंद करण्यात येत आहे. त्यावर उपाययोजना सुरू आहेत. नदीपात्रात निर्माल्य अथवा कचरा टाकू नये. पाणी स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे.
– डॉ प्रवीण निकम, मुख्याधिकारी, देहू नगरपंचायत