“बॉलीवूडमध्ये मला पूर्ण संधीच मिळाली नाही.’असं उर्वशी रौतेलाने म्हटले आहे. एका म्युझिक व्हिडिओच्या लॉन्चिंग प्रसंगी तिने आपल्या मनातली ही खदखद व्यक्त केली. बॉलीवूडमध्ये अद्याप आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर झालाच नाही, अशी तक्रारच तिने मीडियासमोर मांडली. आपल्यातल्या क्षमतेचा पूर्ण वापर होऊ शकेल, अशा चांगल्या प्रोजेक्टचा शोध घेत असल्याचे तिने सांगितले. पण म्हणजे कसा सिनेमा तिला पाहिजे, हे मात्र तिने स्पष्ट केले नाही.
उर्वशी रौतेलाने 2015 साली “मिस इंटरनॅशनल दिवा अवॉर्ड’ जिंकले होते तर त्याच वर्षी “मिस युनिव्हर्स पीजंट’ स्पर्धेत भारताकडून प्रतिनिधित्वही केले होते. 2013 साली “सिंह साहब द ग्रेट’ या सिनेमातून तिने पदार्पण केले होते. त्यानंतर “सनम रे’, “ग्रेट ग्रॅंड मस्ती’ आणि “हेट स्टोरी 4′ या सिनेमामधून तिने प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेतले. सध्या तिच्याकडे मोठा प्रोजेक्ट नसल्यामुळे “बिजली की तार’ या टोनी कक्कडच्या म्युझिक व्हिडिओमध्ये तिने काम केले. तिने केलेल्या आतापर्यंतच्या सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली असेलही कदाचित पण विश्लेषकांनी फारसे गौरवले नव्हते. त्यामुळेच तिला आपली पूर्ण क्षमता वापरली गेली नसल्याचे वाटते आहे. उर्वशी रौतेला आता जॉन अब्राहम बरोबर “पागलपंती’मध्ये काम करते आहे. “पागल्पंती’मध्ये जॉन बरोबरच अनिल कपूर, इलियाना डीक्रूज आणि कृती खरबंदापण असणार आहेत. त्यानंतरही तिचे हेच म्हणणे कायम असेल का हे बघूया.