किवळे – इंद्रायणी नदीचे होणारे प्रदूषण ताबडतोब थांबावावे, यासाठी आमदार सुनील शेळके व इंद्रायणी नदी प्रदूषण समिती यांनी विभागीय आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
यावेळी आमदार सुनील शेळके, पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, नगरपरिषद प्रशासन अधिकारी पूनम पंडित, नगर रचनाकार सोनाली आहेर, सहाय्यक नगर रचनाकार अजिंक्य पवार आदी बैठकीस उपस्थित होते.
वडीवळे, देहू, आळंदी अशी अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीच्या तीरावर वसली आहेत. त्यामुळे या नदीस अनन्य साधारण महत्व आहे. तळेगाव एमआयडीसी, पिंपरी चिंचवड एमआयडीसीचा काही भाग या नदी शेजारी बसला आहे. येथून सोडण्यात येणारे सांडपाणी थेट नदीत मिसळल्याने प्रदुषणात वाढ होते. सुनील शेळके यांनी १६ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. मावळ तालुक्यात बहुतांश सदनिकांचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. लवकरच येथील गृहप्रकल्पांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर एक फेब्रुवारीला या समितीची पुन्हा बैठक होणार आहे.
कारखान्याच्या सांडपाण्याचे काय?
इंद्रायणी नदी जिथून सुरू होते तेथून देहू आळंदी पर्यंत अनेक ठिकाणी प्रदूषण होताना आढळते. यात सर्वात मोठा वाटा आहे तो तळेगाव एमआयडीसी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील काही कारखान्यांचा. बहुतांश कारखान्यातील सांडपाणी गटाराद्वारे थेट नदीत मिसळते. या कारणाने देहूत इंद्रायणी नदीत मासे मरण्याची हकीकत नुकतीच समोर आली होती. या कारखान्याच्या बाबत या बैठकीत काहीच प्रश्न उपस्थित करण्यात आले नाहीत. त्यामुळे इंद्रायणी नदीचे प्रदुषण खरच थांबणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.