IMD Alert : भारतीय हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी; पेरणीसाठी योग्य वेळ निवडण्याचे केले आवाहन

मुंबई/पुणे : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवसांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, वाशीम, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्याचा वेग ताशी 50–60 किमी पर्यंत असू शकतो. या काळात नागरिकांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या कालावधीत नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच वीज पडण्याची शक्यता असल्याने उघड्यावर न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, कारण समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
मराठवाड्यात सरासरीच्या 112% पाऊस
मराठवाड्यातील हवामान अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात मराठवाड्यात सरासरीच्या 112% पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





