नगर, (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीत गंठबंधन न झाल्यास बहुजन मुक्ती पक्ष स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार आहे. लोकशाही देशात संविधान धोक्यात आले असून, संविधानाला बगल देऊन हुकुमशाही पध्दतीने कारभार सुरु आहे. सत्तेसाठी नव्हे, तर बहुजन समाजाला न्याय देऊन प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष सुरु असल्याचे, प्रतिपादन बहुजन मुक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले यांनी केले.
बहुजन मुक्ती पक्षाची जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार नेते रावसाहेब काळे, सुभाष आल्हाट, डॉ. भास्कर रणनवरे, यूसुफ शेख, खालिद खान, राहुल पगारे, नादीर सय्यद, उत्तम पवार, संजय शिंदे, राजेंद्र आढाव, शिवाजी कानगुडे, अजय देठे, उत्तम पवार, श्रीधर शेलार, पाऊल भिंगारदिवे, राम कराळे, दत्ता वामन, विनोद साळवे, अतुल कणगरे, रणसिक जाधव, चैतन्य घोरपडे, तात्या वाघ, आशिष खरे आदी उपस्थित होते.
रावसाहेब काळे म्हणाले की, देशात बहुजन मुक्तीने सर्व प्रथम ईव्हीएम मशीनला विरोध करुन त्याचे धोके निदर्शनास आनले. शेतकरी, कामगार वाचला तर देश वाचणार आहे. लोकप्रतिनिधी आपल्या संस्था वाचवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात जात आहे. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव नसून, सोयीचे राजकारण केले जात आहे.
या बैठकीसाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तर निवडणुकीत एकजुटीने पक्षाची शक्ती दाखविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.