मुंबई :- पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध जिल्ह्यांतील अनेक पदाधिकारी आवर्जून बैठकीला उपस्थित होते.
पुढे शरद पवार म्हणाले की, दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असताना अनेक शिवसैनिक भेटायला येत होते. सत्तेत नसलेला आणि नेहमी फिल्डवर असलेला शिवसैनिक हा कुठेही गेलेला दिसत नाही. ज्यांनी सत्ताबदल करण्याची पावले टाकली, त्या लोकांच्या बाबतीत शिवसैनिक वेगळ्या मनस्थितीत आहेत. अनेकजण बोलले की, 40 मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल, असं शरद पवार यांनी म्हटले आहे.
या बैठकीच्या अनुषंगाने तीन गोष्टी माझ्या मनात होत्या. एक म्हणजे पक्ष संघटना म्हणून पुढील अडीच वर्षात आपल्याला कष्ट करायचे आहेत. मी आताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगत होतो की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आपण 1999 साली केली. आज 23 वर्षांचा कालखंड झालेला आहे. या 23 वर्षात साडे सतरा वर्षे राज्यात सत्तेत होतो. भाजप स्थापनेपासूनचा कालखंड पाहिला तर सव्वा पाच वर्षांचा सत्तेचा कालखंड आहे. त्यामुळे सत्ता नसली तरी चिंता करण्याची गरज नाही. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की, सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा असतो. सत्तेत असताना आपण अनेक निर्णय घेतो, धोरणं आखतो. त्याची माहिती घेण्याची साधने काय? तर तालुका स्तरावरील अधिकारी जिल्हा, राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांपर्यंत अहवाल पाठवतात. तो शंभर टक्के खरा असतो असे नाही. पण सत्ता नसताना थेट लोकांमध्ये जाता येतं. दौरे करताना अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात, त्यातून अनेक प्रश्न समजतात.
दुसरी गोष्ट अशी की, सत्ता नसताना पक्ष संघटना अधिक प्रभावी करता येते. आपण सत्तेत नसताना आज एकत्र आलेलो आहोत. पक्ष संघटना आणखी कशी वाढवायची यासंबंधीची चर्चा करायची होती. अनेक सदस्यांनी याबाबत आपले मत मांडले. निवडणुकांचा उल्लेख काहींनी केला.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत
सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरु आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, असे वक्तव्य केले आहे. ओबीसींना घेऊनच निवडणुका झाल्या पाहीजेत, हा आपला दृष्टीकोन आहे. ओबीसींना बाजूला ठेवून निवडणुका होता कामा नयेत. यानिमित्ताने नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची जबरदस्त शक्ती उभी करण्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. या निवडणुकांमध्ये नेतृत्वाची नवी पिढी तयार करण्याची, तसेच समाजातील सर्व घटकांना आणि तरुणांना संधी कशी देता येईल, याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे.आजच्या बैठकीला जिल्हाध्यक्ष, निरीक्षक उपस्थित आहेत. वरिष्ठ नेते सूचना देतील त्याप्रमाणे जिल्हास्तरावर तरुणांना, लहान घटकांना संधी देण्याचा प्रयत्न करा. पन्नास टक्क्यांच्या आसपास तरुण आणि इतर घटकांना संधी दिल्यास, राज्यात नवीन नेतृत्वाची फळी तयार होईल. त्यामाध्यमातून लोकांच्या कामांना न्याय देता येतो.
संसदीय लोकशाहीवर हल्ला करणे हे सध्या भाजपचे सूत्र दिसत आहे. कर्नाटकमध्ये त्यांचे राज्य नव्हते. काँग्रेसची माणसं फोडून तिथे सत्ता हस्तगत केली. मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसचे सरकार होते. त्याठिकाणीही फोडाफोडी करुन राज्य हातात घेतले. महाराष्ट्रात काय झाले, हे सर्वांनाच माहीत आहे. या सगळ्याचा उद्देश काय? तर लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर आलेल्या लोकांना सत्तेपासून बाजूला करणे. सत्ता आपल्याच हातात केंद्रीत होईल, याची काळजी घेणे. सत्ता विकेंद्रीत झाली पाहीजे. मात्र आज केंद्रातील सरकार सबंध देशातील सत्ता केंद्रीत करत आहे. ही केंद्रीत झालेली सत्ता एक विशिष्ट विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय. सत्तेचा गैरवापर करुन एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
१९७५ साली मी राज्य मंत्रिमंडळात काम करत होतो त्यावेळेस इंदिरा गांधींनी आणीबाणीचा निकाल दिला. आम्ही तरुण आमदार तेव्हा नाराज होतो, आमची नाराजी देखील व्यक्त केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आणीबाणी झाल्यावर सुरुवातीला लोक चांगलं बोलले. पण ती सत्ता केंद्रीत झाली होती. केंद्रीत सत्ता भ्रष्ट व्हायला लागते. हजारो लोकांनी याविरोधात भाषणे केली आणि लोकांनी ती सत्ता उखडून टाकली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा अनेक ठिकाणी पराभव झाला. जनता पक्षाचे सरकार आले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता, मात्र असे घडले.
लोकशाहीमध्ये तुम्ही आणि मी यापेक्षा सामान्य लोक अधिक हुशार असतात. आपल्याकडे बघणारे हजारो लोक असतात. ते लोक बोलत नाहीत. पण मतदानाची संधी मिळाल्यावर ते निर्णय घेतात. 1977 साली ज्यांना राज्य मिळालं, त्यांना ते चालवता आलं नाही. मग पुन्हा दोन वर्षांनी लोकांनी इंदिरा गांधींच्या हातात सत्ता दिली. याचा अर्थ लोक बघत असतात, निरीक्षण करतात आणि राजकारण्यांनाही जनता योग्य रस्त्यावर आणते. आज केंद्रीय सत्ता जरी ठिकठिकाणचे राज्य बरखास्त करण्याचे काम करत असली तरी आज ना उद्या सामान्य जनता याचा निकाल घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांची तयारी असली पाहीजे, असे शरद पवार यांनी सांगितले.
आता संघटनेसाठीचा पुढचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते देतील. राज्यात पाऊस चांगला सुरु आहे. पर्जन्यकाळ संपल्यावर आपल्याला जोमाने काम करायचे आहे. पुढचे अडीच वर्ष जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून, संघटना बळकट करणे, लोकांच्या अडचणी समजून घेणे यासारखी कामं करायची आहेत. सुदैवाने आपल्याकडे विरोधी पक्षनेतेपद असल्यामुळे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ आपल्याकडे आहे. तरीही लोकांवर अन्याय होत राहिला तर लोकशाहीच्या चौकटीत रस्त्यावर उतरायचा देखील निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असे देखील त्यांनी सांगितले.
एकही आमदार फुटला नाही, याचा अभिमान
शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात महसूल खात्याचे सहा विभाग आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून या विभागांप्रमाणे संघटनेची जबाबदारी काही लोकांकडे द्यावी. ज्यांच्यावर जबाबदारी असेल त्यांनी आपल्या विभागावर संपूर्ण लक्ष ठेवून काम करावे. याचपद्धतीने महिला, युवक, विद्यार्थी, सामाजिक न्याय आणि ओबीसी विभागाने देखील काम करावे. मुंबईतही प्रभावीपणे काम करावे. हे सर्व उत्तमरीत्या झाले तर चित्र नक्कीच बदलेल. राज्यात एवढी मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो. सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगले काम केल्याचे ठिकठिकाणी ऐकायला मिळते. प्रदेशाध्यक्षांनी देखील सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना व जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे, असे आवाहन यानिमित्ताने शरद पवार यांनी केले.