Chhagan Bhujabal : पवार कुटुंब, ठाकरे कुटुंब एकत्र आले तर….; छगन भुजबळ काय म्हणाले ? नाराजीवरही केलं भाष्य

Chhagan Bhujbal : महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून स्थान न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. तसेच ते भाजपच्या वाटेवर जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीतून प्रवास केला आणि त्यानंतर एका कार्यक्रमात एकाच मंचावर शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र आले होते. या दोन घटनांची खूप मोठी चर्चा झाली. शरद पवार यांनी भुजबळ यांना चिठ्ठीवर लिहून दिलेल्या संदेशाचीही चर्चा झाली. अशातच नाराजी आणि अजित पवार, शरद पवार तसेच ठाकरे कुटुंब एकत्र येणार असल्याच्या विधानावर त्यांनी भाष्य केलं आहे.
मी नाराज आहे असं सारखं सारखं विचारत बसू नका असे म्हणत शरद पवार अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल, असे ते म्हणाले आहेत. नाराजी दूर करण्यासाठी सुनील तटकरेंचा तुम्हाला फोन आला होता का? या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले मला कुणाचा फोन वगैरे आलेला नाही. तसेच तुमची नाराजी दूर झाली आहे का? यावर बोलताना भुजबळ म्हणाले, “मी नाराज आहे, नाराज आहे असं रोज सांगत बसू का? तसं रोज सांगत राहिलो तर लोक तुमचं चॅनल पाहणं बंद करतील. तो विषय सोडून द्या.” असे वक्तव्य त्यांनी केलं आहे.
पवार कुटुंब, ठाकरे कुटुंब एकत्र आले तर आनंदच
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकांनी देवदर्शन करीत नवं वर्ष सुख समाधाने आणि भरभराची जावे अशी मागणी परमेश्वराकडे केली. अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी देखील पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यांनी विठ्ठलाकडे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ दे असं साकडं घातलं होतं. तसेच नव्या वर्षात ते एकत्र आलेले दिसावेत असे आशाताई म्हणाल्या होत्या. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, पवार कुटुंब, असेल ठाकरे कुटुंब असेल त्यांनी एकत्र यावं. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. हे सगळे एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल, असे विधान त्यांनी केलं आहे.





